पाऊस आला रे! विदर्भातील या ६ जिल्ह्यांना मोठी खुशखबर; जाणून घ्या हवामान विभागाचा ताजा अंदाज

पुणे : विदर्भात गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांची चिंता वाढली आहे. ऑगस्ट महिन्यात विदर्भात पावसाची मोठी तूट निर्माण झाली असून, अनेक भागांमध्ये अपेक्षित पाऊस झालेला नाही. त्यामुळे शेतीपिकांवरही त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे.
हवामान तज्ज्ञांच्या अंदाजानुसार, येत्या २ ते ५ सप्टेंबरदरम्यान विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाच्या सरी बरसण्याची शक्यता आहे. त्यामुळे पावसाच्या तुटीमुळे चिंतेत असलेल्या शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.

विदर्भातील ६ जिल्ह्यांना यलो अलर्ट
नागपूर हवामान विभागाने पूर्व विदर्भातील सहा जिल्ह्यांसाठी २ ते ५ सप्टेंबरदरम्यान यलो अलर्ट जारी केला आहे. या कालावधीत काही ठिकाणी पाऊस, मेघगर्जनेसह जोरदार सरी पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.


दरम्यान, ४ सप्टेंबर रोजी गोंदिया जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. या दिवशी जिल्ह्यात काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आहे.
ऑगस्टमध्ये पावसाने दिली हुलकावणी
नागपूर हवामान विभागाचे शास्त्रज्ञ डॉ. प्रवीण कुमार यांच्या माहितीनुसार, ऑगस्ट महिन्यात विदर्भात पावसाचे प्रमाण अपेक्षेपेक्षा कमी राहिले. अनेक भागांमध्ये पावसाअभावी शेतीपिकांना पाण्याची गरज भासत आहे.
पावसाची तूट मोठी असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली असून, आगामी काही दिवसांत होणारा पाऊस ही तूट कितपत भरून काढतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
हवामानातील बदलांचा परिणाम?
दरम्यान, हवामानातील बदलत्या परिस्थितीचा पावसावर परिणाम होत असल्याचे हवामान तज्ज्ञांकडून सांगण्यात येत आहे. पुढील काळात परिस्थितीत बदल झाल्यास पावसाच्या प्रमाणातही फरक पडू शकतो. त्यामुळे विदर्भात सर्वदूर आणि सातत्यपूर्ण पाऊस कधी होणार, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष आहे.
राज्यातील इतर भागांतही पावसाची तूट
ऑगस्ट महिन्यात राज्यातील काही भागांमध्येही पावसाचे प्रमाण कमी राहिले आहे. मराठवाड्यात पावसाची मोठी तूट नोंदवण्यात आली असून, विदर्भासह राज्यातील विविध भागांमध्ये पावसाचे प्रमाण अपेक्षेपेक्षा कमी राहिले आहे.
त्यामुळे आगामी काही दिवसांत महाराष्ट्रात कुठे पाऊस पडणार आणि कोणत्या भागात पावसाचा जोर वाढणार, याकडे शेतकरी आणि नागरिकांचे लक्ष लागले आहे.