पालखी सोहळा तयारीचा सरकारी बाबूंचा ढोंगीपणा उघड! पुणे-सोलापूर महामार्गावर जिवघणे खड्डे वारकऱ्यांच्या जिवावर बेतण्याची शक्यता…

जयदीप जाधव
उरुळीकांचन : संपूर्ण वारकरी सांप्रादाय आषाढी वारीसाठी पंढरपूर शक्तिपीठाकडे पायी मार्गाने मार्गस्थ होण्यासाठी भक्तिरसात दंग झाला असताना झोपी गेलेली प्रशासन व्यवस्था पालखी सोहळ्याच्या तयारीचे ढोंग करीत असल्याचा संतापजनक प्रकार सार्वजनिक बांधकाम विभाग व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या कृतीने पुढे आला आहे.संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा अवघ्या दोन दिवसांनी पुणे-सोलापूर महामार्गाहून मार्गस्थ होत असताना या राष्ट्रीय महामार्गावर भले मोठे खड्डे प्रवाश्यांच्या जिविताशी खेळत असल्याने झोपलेल्या यंत्रणेमुळे या मार्गावर पंढरीचा प्रवास वारकऱ्यांच्या जिवावर उठण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा रविवार (दि.२१ )रोजी मुक्कासाठी लोणीकाळभोर येथे विसावला जाणार आहे. त्यानंतर पालखी सोहळा सलग तीन दिवस यवत , वरंवड मुक्कासाठी या मार्गावर मार्गस्थ होणार आहे.यापालखी सोहळ्याने लाखो वैष्णवांची पाऊले या मार्गावरून पंढरीच्या दिशेने मार्गस्थ होणार आहे.मात्र राष्ट्रीय महामार्ग वारकऱ्यांसाठी सुरक्षित नसल्याची गंभीर बाब राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कृतीतून समोर आली आहे.
या महामार्गावर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने राष्ट्रीय महामार्ग देखभाल -दुरुस्ती साठी ९.३० कोटी रुपयांची निविदा काढून ठेकेदाराला दुरुस्तीचे काम दिले आहे. या कामात संरक्षित जाळ्या, फलक, सुरक्षित उपाय, खड्डे बुजविणे, माती काढणे, स्ट्रीट लाईट दुरुस्त करणे इ. कामांचा सामावेश आहे.मात्र पालखी सोहळा अगदीदोन दिवसांनी या मार्गावर मार्गस्थ होणार असताना महामार्ग बेवारस पडल्याने धोकादायक बनला आहे.
या महामार्गावरुन कवडीपाट ते यवत पर्यंत रस्त्यावरती भले मोठे खड्डे तसेच संरक्षित कुंपण जाळी, तुटलेले कठडे, गाळचिखल अशा धोकादायक अवस्थेत आहे. या मार्गावरून पालखी सोहळ्याच्या तयारीसाठी मंत्री , जिल्हाधिकारी, आमदार तसेच प्रशासनाच्या विविध विभागांनी पाहणी केली आहे. अशा पध्दतीने तयारीचे वास्तव रुप समोर आल्याने नागरीक प्रचंड संतापले आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व सार्वजनिक बांधकाम विभागाची ही संयुक्तिक जबाबदारी असताना प्रशासनाचा निष्काळजीपणा हा प्रवाश्यांच्या जिवावर उलटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
कवडीपाट ते यवत तर पाटस ते इंदापूर पर्यंत महामार्ग दुरुस्तीची कामे ठेकेदाराला दिली आहे. ठेकेदाराने काही कामे सुरू केली आहे. यवत -कासुर्डी दरम्यान खड्डे बुजविणे व इतर कामे पूर्ण होत आहे. उर्वरीत कामे लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी पाहणी सुरू आहे.
– रोहन जगताप , शाखा अभियंता , एनएचएआय