सुनेत्रा पवारांना व्यासपीठावरच ‘वेटिंग’? नाव पुकारलं, सत्कार झाला; पण भाषणाआधीच बदलला संपूर्ण कार्यक्रम

मुंबई : महाराष्ट्र कृषी दिनानिमित्त आयोजित राज्यस्तरीय कृषी पुरस्कार वितरण सोहळ्यात कृषी क्षेत्रातील विविध पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि अनेक मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते. मात्र पुरस्कार वितरणाइतकाच कार्यक्रमातील एका अनपेक्षित गोंधळाचीही चर्चा रंगली.

कार्यक्रमादरम्यान सूत्रसंचालकांनी सुनेत्रा पवार यांना भाषणासाठी आमंत्रित केले. मात्र त्याचवेळी कार्यक्रमाच्या वेळापत्रकात बदल झाल्याने त्यांचे भाषण पुढे ढकलण्यात आले. त्यानंतर त्यांचा सत्कार पार पडला आणि पुन्हा एकदा त्यांचे नाव व्यासपीठावरून पुकारण्यात आले. मात्र याचदरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कार्यक्रमस्थळी पोहोचल्याने आयोजकांनी प्रोटोकॉलनुसार कार्यक्रमाची क्रमवारी बदलली. त्यामुळे सुनेत्रा पवार यांना पुन्हा प्रतीक्षा करावी लागली.
या संपूर्ण घडामोडीनंतर आयोजकांच्या लक्षात नियोजनातील त्रुटी आल्याचे सांगितले जात असून त्यानंतर कार्यक्रम पूर्वनियोजित पद्धतीने पुढे नेण्यात आला. तरीही एका प्रमुख मान्यवराचे नाव दोनदा जाहीर होऊनही त्यांना तत्काळ भाषणाची संधी न मिळाल्याने उपस्थितांमध्ये आश्चर्य व्यक्त करण्यात आले.

या घटनेमुळे कार्यक्रमातील प्रोटोकॉल आणि समन्वयावर चर्चा सुरू झाली असून, “सुनेत्रा पवारांना भर कार्यक्रमात वेटिंगवर ठेवण्यात आलं का?” असा सवालही उपस्थित केला जात आहे. मात्र या प्रकरणावर आयोजकांकडून कोणतेही अधिकृत स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही. तसेच सुनेत्रा पवार यांनीही यावर प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाही.
