”जर वारकऱ्यांच्या पायाला खडा टोचला, तर मी तुम्हाला टोचणार” – हवेलीचे उपविभागीय अधिकारी डॉ. यशवंत माने यांचा प्रशासकीय अधिकाऱ्यांना सज्जड दम ….

उरुळीकांचन : जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा 22 जून ला लोणी काळभोर व कदमवाकवस्ती येथे मुक्कामी येणार आहे. त्यामुळे सर्व शासकीय यंत्रणांनी सतर्क होऊन पालखी सोहळ्याचे मोठ्या दिमाखात स्वागत करावे. पालखी सोहळ्यादरम्यान वारकऱ्यांच्या सेवेसाठी कार्यतत्पर राहून सर्वोतोपरी प्रयत्न करावे. ”जर वारकऱ्यांच्या पायाला खडा टोचला, तर मी तुम्हाला टोचणार”, हे मात्र तुम्ही निश्चित लक्षात ठेवा. असा सज्जड दम हवेलीचे उपविभागीय अधिकारी यशवंत माने यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिला आहे.
कदमवाकवस्ती (ता. हवेली) येथील पालखी तळ मुक्काम पूर्वतयारी नियोजन बैठकीचे गुरुवारी (ता.5) सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोलताना हवेलीचे उपविभागीय अधिकारी यशवंत माने यांनी सर्व विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना वरील सज्जड दम दिला आहे.
यावेळी लोणी काळभोरच्या अपर तहसीलदार तृप्ती कोलते, हवेलीचे गट विकास अधिकारी शिवाजीराव नागवे, महावितरणचे उपकार्यकारी अभियंता महेश धाडवे, सहाय्यक अभियंता विक्रांत ओहोळ, हवेली तालुका आरोग्य विस्तार अधिकारी महेश वाघमारे, मंडलाधिकारी लक्ष्मण बांडे, उरुळी कांचन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर पाटील, लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक दिगंबर सोनटक्के, उदय काळभोर, वन परिमंडळ अधिकारी प्रमोद रासकर सार्वजनिक बांधकाम विभागाचे कनिष्ठ अभियंता श्रीवर्धन जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना प्रांताधिकारी यशवंत माने म्हणाले की, आषाढी वारी निमित्ताने दरवर्षी लाखो वैष्णव भक्त पंढरपूरला पांडुरंगाचे दर्शन घेण्यासाठी पायी चालत जातात. त्यामुळे वारकऱ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने पिण्याचे पाणी व जेवण चांगले मिळाले पाहिजे. त्याचबरोबर वारकऱ्यांच्या मुक्कामाच्या व्यवस्थेकडे बारकाईने लक्ष द्या. वृद्ध वारकऱ्यांची आरोग्याच्या दृष्टीने योग्य ती काळजी घ्या. गोळ्या औषधांची एक्सपायरी डेट तपासूनच उपचार करा.
लोणी काळभोर व कदमवाकवस्ती येथील सर्व पाण्याचे स्त्रोत तपासून घ्या. दोन्ही गावांमधील विद्युत पुरवठा सुरळीत ठेवा. ठिकठिकाणी स्वच्छतागृहे उभारा. पालखी स्थळ व परिसर स्वच्छ ठेवा. सर्व अधिकाऱ्यांनी या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे. पोलीस प्रशासनाने पालखी सोहळ्यादरम्यान अलर्ट राहावे. सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्याची दुरुस्ती त्वरित करावी. यामध्ये कोणीही हलगर्जीपणा केला तर त्याच्यावर कडक कारवाई करण्यात येईल. असा इशारा हवेलीचे प्रांताधिकारी यशवंत माने यांनी दिला आहे.
यावेळी लोणी काळभोरचे सरपंच भरत काळभोर, उपसरपंच गणेश कांबळे, उपसरपंच कदमवाकवस्तीचे उपसरपंच नासीर पठाण, माजी सरपंच चित्तरंजन गायकवाड, माजी सरपंच योगेश काळभोर, ग्रामपंचायत सदस्य नागेश काळभोर, आकाश काळभोर, अविनाश बडदे, ग्रामविकास अधिकारी अमोल घोळवे, सतीश गवारी, पोलीस पाटील प्रियांका भिसे, दादा काळभोर, पाषाणकर गॅस एजन्सीचे कर्मचारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
लोणी काळभोरला निधी मिळावा – सरपंच भरत काळभोर
आषाढी वारी निमित्ताने दरवर्षी लाखो वैष्णव भक्त पंढरपूरला पांडुरंगाचे दर्शन घेण्यासाठी पायी चालत जातात. पुणे शहरातील मुक्काम आटोपल्यानंतर संत तुकाराम महाराज पालखी सोहळा हा ग्रामीण भागातील पहिला मुक्काम करण्यासाठी लोणी काळभोरला येत आहे. मात्र आता कदमवाकवस्ती येथे नवीन पालखी तळ झाले आहे. पण अजूनही 70 टक्क्यांहून अधिक पालखी सोहळ्यातील दिंड्या ह्या लोणी काळभोरला मुक्कामी असतात. त्यामुळे प्रशासनाने कदमवाकवस्ती ग्रामपंचायतीबरोबरच लोणी काळभोर गावालाही निधी द्यावा.-भरत काळभोर (सरपंच, लोणी काळभोर, ता. हवेली)