Sharad Pawar : जरांगेंच्या भेटीदरम्यान काय झालं? स्क्रीप्टच्या आरोपांवर शरद पवारांचे प्रत्युत्तर, सगळंच सांगून टाकलं…
Sharad Pawar : मनोज जरांगे पाटील यांच्यासह मराठा समाजाने केलेल्या आंदोलनं आणि उपोषणांनंतर राज्य सरकारने मराठा समाजासाठी १० टक्के स्वतंत्र आरक्षणाची घोषणा केली आहे. परंतु, मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्यावं अशी मागणी जरांगे पाटील यांनी लावून धरली आहे.
तसेच मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जहरी टीका केली. यामुळे जरांगे पाटील यांना सत्ताधाऱ्यांच्या टीकेला सामोरे जावे लागत आहे.
याचे पडसाद अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी पाहायला मिळाले. या प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी होणार आहे. तसेच जरांगेच्या टीकेला राजकीय वास येतोय, असा दावा भाजपकडून केला जात आहे.
जरांगे पाटील शरद पवारांची स्क्रीप्ट बोलत असल्याचा आरोप भाजप आमदारांकडून केला जात असताना देवेंद्र फडणवीस यांनीही जरांगेंची स्क्रीप्ट शरद पवारांसारखीच असल्याचा आरोप केला आहे. यावर आता शरद पवारांनी प्रत्युत्तर दिले आहे. “जबाबदार लोक इतकं पोरकट बोलतात हे मी महाराष्ट्रात कधी पाहिलं नाही, असं प्रत्युत्तर शरद पवारांनी दिले आहे. Sharad Pawar
शरद पवार पुढे म्हणाले की, मनोज जरांगेंचे उपोषण सुरू झाल्यापासून त्यांना भेटायला पहिला मी गेलो. पण त्यावेळी मी त्यांना सांगितलं की तुमच्या मागणीचा आग्रह मी समजू शकतो.
महाराष्ट्रचे सामाजिक ऐक्य टिकेल असे करा. तुमची मागणी समजू शकतो पण इतर समाजासाठीची कटुता योग्य दिसणार नाही, इतकंच माझं आणि त्यांचं संभाषण झालं आहे, त्यानंतर आजपर्यंत एका शब्दाने माझं आणि त्यांचं बोलणं नाही, असं स्पष्टीकरण शरद पवारांनी दिले आहे.