Rain : राज्यात पावसाचा जोर वाढणार, शेतकऱ्यांचे लागले लक्ष, पुढील चार दिवस महत्वाचे…

Rain मुंबई : राज्यात ऑगस्टमध्ये रुसलेला मान्सून सप्टेंबरमध्ये सुरु झाला. सप्टेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात पावसाला (Rain) सुरुवात झाली. तीन, चार दिवस पाऊस झाल्यानंतर पावसाने विश्रांती घेतली. त्यानंतर राज्यात १४ सप्टेंबरपासून पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला होता. (Rain)
आज (ता. १५) पूर्व विदर्भात जोरदार पावसाचा इशारा (ऑरेंज अलर्ट) आहे. उर्वरित विदर्भासह, कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात जोरदार पावसाचा इशारा (येलो अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे.
पुणे जिल्ह्यासह राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान विभागाकडून व्यक्त केली गेली आहे. बंगालच्या उपसागरातील कमी दाब क्षेत्र तयार झाले असून त्याची तीव्रता वाढली आहे.
तसेच दक्षिणेकडे सरकलेला मॉन्सूनचा आस पूरक ठरल्याने राज्यातच पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. पुणे जिल्ह्यातील घाटमाथ्यावर काही ठिकाणी जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
विदर्भासह मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रात ढग जमा होत असून, तुरळक ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे. पूर्व विदर्भातील भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यात जोरदार पावसाचा इशारा (ऑरेंज अलर्ट), तर उर्वरित विदर्भासह कोकण, मध्य महाराष्ट्राचा घाटमाथा, खानदेश, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा (येलो अलर्ट) देण्यात आला आहे. उर्वरित राज्यात विजांसह पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.