‘तुमच्या आजोबांना विचारा किती कुटुंब…’ राधाकृष्ण विखेंचे रोहित पवार यांना प्रत्युत्तर

अहमदनगर : आगामी काळात म्हणजेच साधारण ऑक्टोबर – नोव्हेंबरमध्ये राज्यात विधानसभा निवडणूक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे महायुती तसेच महाविकास आघाडीने निवडणुकीची तयारी सुरु केली आहे.
तसेच त्ताधारी विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. आमदार रोहित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर खरमरीत टिका केली आहे. ही टिका मात्र राधाकृष्ण विखे पाटील यांच्या चांगलीच जिव्हारी लागली आहे.
त्यांनीही मग रोहित पवार यांना सुनावत आजोबा शरद पवारांनी काय-काय केले याची आठवण करून दिली आहे. शिवाय रोहित यांच्या आरोपांवर भडकून त्यांनाच जाब विचारला आहे.
पक्ष फोडले. कुटुंब फोडली. हेच काय ते देवेंद्र फडणवीस यांचे कर्तुत्व अशी टिका रोहित पवार यांनी केली आहे. देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे राज्यात दोन पक्ष फुटले. कुटुंबात त्यांनीच फुट पाडली. अशा प्रकारचे राजकारण या आधी कधीच महाराष्ट्रात झाले नव्हते असेही रोहित पवार असे म्हणाले. त्यांची ही टीका भाजप नेत्यांच्या चांगलीच जिव्हारी लागली आहे.
याबाबत भाजप नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी रोहित पवारांना प्रत्युत्तर दिले आहे. ते म्हणाले, रोहित पवार जर म्हणत असतील की देवेंद्र फडणवीसांनी पक्ष फोडले, घरं फोटली तर त्यांनी पहिला हा प्रश्न त्यांचे आजोबा शरद पवार यांना विचारला पाहीजे.
शरद पवारांनी आपल्या हयातीत किती कुटुंब फोडली? किती कुटुंबाची धुळधाण उडवली? किती जणांचे राजकीय करिअर उद्धवस्त केले? हे सर्व प्रश्न त्यांनी शरद पवारांना विचारले पाहीजे. त्याची उत्तर मिळाल्यानंतर ते अशी टिका करणार नाहीत, असेही विखे पाटील यांनी सांगितले आहे.