Pune : पळून जाऊन लग्न करण्यासाठी मित्राला केली मदत, मुलीच्या नातेवाईकांकडून दोघांचे अपहरण करत मारहाण, लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Pune : सातारा येथून पहाटे मुलीला पळवून आणून तिचे मित्राबरोबर लग्न लावून दिले. दोघेही पळून गेले. मित्राला लग्न लावण्यात मदत करणार्या दोघांचे मुलीच्या नातेवाईकांनी अपहरण करून त्यांना बेदम मारहाण केल्याची घटना उघडकीस आली आहे.
हा प्रकार हांडेवाडी येथील स्वप्नलोक सोसायटी व खटाव तालुक्यातील कुमठे नागाची येथे २६ सप्टेबर रोजी मध्यरात्री साडेबारा ते सकाळी ११ वाजेच्या दरम्यान घडला आहे.
याप्रकणी प्रतिक वसंत विभुते (वय. २३, रा. स्वप्नलोक, हांडेवाडी) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी रोहित मांडवे, ओंकार गुरव, आकाश मांडवे, प्रकाश मांडवे, कविश्वर मांडवे, अजय मांडवे, चंद्रकांत मांडवे (सर्व रा. कुमठेनागाची, ता. खटाव, जि. सातारा) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, फिर्यादी प्रतिक विभुते व त्याचे मित्र हे डिलिव्हरी बॉयचे काम करतात. त्यांचा मित्र सुमित विकास माने याचे एका तरुणीबरोबर प्रेमसंबंध आहेत. या तरुणीच्या घराच्यांचा लग्नाला विरोध होता. त्यामुळे त्यांचे लग्न लावण्यास मदत करण्याचा निर्णय फिर्यादी आणि त्यांच्या मित्रांनी घेतला. Pune
त्यासाठी फिर्यादी आणि त्याचे मित्र सातार्याला गेले. तेथे जावून पहाटेच्या सुमारास या तरुणीला पळवून आणले. त्यानंतर त्यांनी लग्न लावून त्या दोघांना दुसरीकडे पळवून लावले.दरम्यान, या सर्व प्रकारानंतर या तरुणीचे भाऊ आणि नातेवाईक तिचा शोध घेत होते.
मध्यरात्रीच्या सुमारास ते सौरभ चव्हाण व ऋषीकेश मांडवे यांना घेऊन तिचे भाऊ व नातेवाईक फिर्यादी यांच्या हांडेवाडी येथील सोसायटीत आले. फिर्यादी यांना खाली बोलावून घेत सुमित माने व आमची बहिण कोठे आहे, याची चौकशी करु लागले. तेव्हा फिर्यादी यांनी मला माहिती नाही, असं सांगितले. Pune
त्यानंतर त्यांनी कमरेच्या पट्याने व फायबर पाईपाने फिर्यादी व त्यांचे मित्र यांना बेदम मारहाण केली. तसेच फिर्यादी व ऋषीकेश मांडवे यांना जबरदस्तीने त्यांच्या गाडीत बसवून अपहरण केले. तेथील चौकात असलेल्या राजमुद्रा गणेश मंडळ येथील पत्र्याचे शेडमध्ये नेऊन बसविले.
त्यांना पुन्हा पट्याने, काठीने आणि अॅल्युमिनियमच्या वायरने मारहाण केली. ते दोघे कोठे पळून गेले, याची यांना माहिती नसल्याचे लक्षात येताच त्यांना गाडीत बसवून सोडून दिले. दरम्यान, फिर्यादी व त्यांचे मित्र पुण्यात आल्यावर त्यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस उपनिरीक्षक नलावडे पुढील तपास करीत आहेत.