अर्थसंकल्पात पुरंदर विमानतळाबाबत एक शब्दही नाही! अजितदादांच्या पुण्याची पाटी कोरीच, अवाक्या बाहेरील योजनांमुळे अर्थकारण फसलं?

पुणे : काल राज्याचा अर्थसंकल्प जाहीर करताना उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांना पुण्याचाच विसर पडला आहे. पुण्यातील अनेक महत्त्वाच्या प्रकल्पांना राज्य सरकारकडून निधीची तरतूद केली जाईल, ही अपेक्षा होती. मात्र सगळ्यावर पाणी फेरल गेलं आहे.
अर्थसंकल्पात राज्यभरातील लहानमोठ्या शहरातील विमानतळांची जंत्री वाचताना पुण्यासाठी पुरंदर येथील बहुप्रतीक्षित नव्या आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या उल्लेखही अजित पवार यांनी केला नाही. यामुळे विमानतळ नेमकं होणार की नाही असा प्रश्नच उपस्थित केला जात आहे. त्यामुळे या अर्थसंकल्पातून पुण्याची पाटी कोरीच राहिली आहे. यामुळे नाराजी आहे.
पुण्यात राज्य आणि केंद्र सरकारमधील चार आणि एक असे पाच मंत्री आहेत. त्यामुळे पुण्यातील विकासाचा वेग हा इतर कोणत्याही जिल्ह्यांपेक्षा अधिक असेल, अशी अपेक्षा असताना अर्थसंकल्पात पुण्यासाठी कुठलीही भरीव तरतूद करण्यात आलेली नाही. विशेष म्हणजे अजित पवार जे पुण्याचे पालकमंत्री आहेत, आणि राज्याचे अर्थमंत्री आहेत, त्यांच्याकडून अपेक्षा होती.
दरम्यान, राज्यातील विविध विमानतळांना भरघोस निधी देताना पुरंदरच्या प्रस्तावित विमानतळाच्या भूसंपादनावर साधे भाष्यही केले नाही. पुरंदर विमानतळाचा नामोल्लेखही टाळण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. या विमानतळाला नावही देण्यात आले आहे. मात्र आर्थिक घडी बिघडली असल्याचे सांगितले जात आहे.
अनेक योजनांना देखील कात्री लावण्यात आली आहे. त्याशिवाय, पुणे-लोणावळा दरम्यानच्या तिसऱ्या व चौथ्या मार्गिकेसाठी राज्य सरकारकडून निधीची तरतूद होईल, ही अपेक्षा पूर्ण झालेली नाही. यामुळे पुण्याला काही मिळाले नसल्याचे सांगितले जात आहे. अनेक योजना बंद होण्याच्या मार्गावर आहेत.