मुंबई, पुणे, ठाणेकरांसाठी पुढचे 48 तास अत्यंत महत्त्वाचे ; यलो अन ऑरेंज अलर्ट जारी

पुणे : गेल्या आठवडाभरापासून राज्यात सर्वत्र मुसळधार पाऊस कोसळत आहे. बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्र अधिक पोषक ठरल्याने राज्यात आज २६ सप्टेंबरपासून पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे आता पुणे, मुंबई,ठाणेकरांसाठी पुढचे 48 तास महत्त्वाचे असणार आहेत.२७ आणि २८ सप्टेंबरला मुंबईसह पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाब क्षेत्रामुळे आज कोकण किनारपट्टी (ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग), पश्चिम महाराष्ट्रातील घाटमाथा (पुणे, सातारा, कोल्हापूर), मराठवाडा (धाराशिव, लातूर, परभणी, हिंगोली, नांदेड) आणि विदर्भातील (बुलडाणा, वाशीम, यवतमाळ, चंद्रपूर) या जिल्ह्यांत जोरदार पावसाची शक्यता आहे. हवामान विभागाने या सर्व भागांसाठी सतर्कतेचा इशारा (यलो अलर्ट) जारी केला आहे.
राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये २५ ते ३० सप्टेंबर दरम्यान पावसाचा जोर कायम राहणार आहे. विशेषतः २७ आणि २८ सप्टेंबर रोजी येत्या दोन दिवसात मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, कोल्हापूर, सातारा आणि लातूर या जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
