पुढील 24 तास महाराष्ट्रासाठी धोक्याचे! 7 जिल्ह्यांना यलो अलर्ट; धरणांतून विसर्ग वाढला, NDRF मैदानात

मुंबई : राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसानंतर आता पुढील 24 तास महत्त्वाचे ठरणार असल्याचा इशारा भारतीय हवामान विभागाने दिला आहे. कोकण, घाटमाथा आणि विदर्भातील अनेक भागांत जोरदार पावसाची शक्यता कायम असून सात जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. दरम्यान, धरणांतील पाणीसाठा झपाट्याने वाढत असल्याने अनेक ठिकाणी विसर्ग सुरू झाला असून नदीकाठच्या भागांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुणे, रायगड, रत्नागिरी, सातारा आणि कोल्हापूरच्या घाटमाथा भागात आज दिवसभर जोरदार सरी कोसळण्याची शक्यता आहे. तर विदर्भातील गडचिरोली, गोंदिया, अमरावती, अकोला, वाशिम आणि चंद्रपूर जिल्ह्यांतही मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. या भागांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला असून स्थानिक प्रशासनाला सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. उर्वरित राज्यातही ठिकठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.

सध्या मान्सूनला पोषक असलेली वातावरणीय परिस्थिती कायम आहे. कमी दाबाचा पट्टा उत्तर भारतातून ईशान्येकडे सक्रिय असून गुजरातपासून उत्तर केरळ किनारपट्टीपर्यंत आणखी एक कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. या दोन्ही प्रणालींचा परिणाम महाराष्ट्रावर होत असून पुढील काही दिवस पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.


जळगाव जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांत झालेल्या मुसळधार पावसामुळे परिस्थिती गंभीर बनली आहे. अमळनेर आणि पारोळा तालुक्यांत वेगवेगळ्या घटनांमध्ये एकाचा बुडून मृत्यू झाला असून पुराच्या पाण्यात वाहून गेलेले तीन जण अद्याप बेपत्ता आहेत. या पार्श्वभूमीवर नागपूर येथून राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचे (NDRF) विशेष पथक जळगावमध्ये दाखल झाले आहे. चार अधिकारी, 30 जवान आणि दोन महिला जवानांचा समावेश असलेले हे पथक बचाव आणि मदतकार्यांसाठी सज्ज ठेवण्यात आले आहे.
पावसामुळे राज्यातील प्रमुख धरणांमधूनही मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. उजनी धरणातून सुमारे 80 हजार क्युसेक, तर वीर धरणातून 63 हजार क्युसेक पाणी सोडण्यात येत आहे. त्यामुळे भीमा नदीच्या पाणीपातळीत वाढ होण्याची शक्यता लक्षात घेऊन नदीकाठच्या भागांतील नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. संभाव्य पूरस्थिती टाळण्यासाठी पुणे जिल्ह्यातील व्यास नारायण झोपडपट्टीतील रहिवाशांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्यात आले आहे.
दरम्यान, हवामान विभागाने 2 ते 4 ऑगस्टदरम्यान देशातील अनेक राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. महाराष्ट्रासह उत्तर प्रदेश, राजस्थान, हरियाणा, दिल्ली आणि चंदीगडमध्येही पुढील काही दिवस पावसाचा जोर कायम राहण्याचा अंदाज आहे.
राज्यातील नागरिकांनी नदी-नाल्यांजवळ जाणे टाळावे, पूरग्रस्त भागात अनावश्यक हालचाल करू नये आणि स्थानिक प्रशासन तसेच हवामान विभागाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. पुढील 24 तासांत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असल्याने प्रशासनानेही आपत्कालीन यंत्रणा सतर्क ठेवली आहे.