पावसाबाबत मोठी अपडेट! राज्यात पुन्हा धो-धो पाऊस बरसणार; ‘या’ भागांना मिळणार दिलासा

मुंबई : राज्यातील शेतकरी सध्या पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. मात्र, पुढील चार दिवस राज्यात पावसाची शक्यता कमी असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने व्यक्त केला आहे. त्यामुळे पावसाअभावी अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांची चिंता आणखी वाढली आहे. विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागांत चार दिवसांनंतर पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
यंदाच्या मॉन्सूनवर एल निनोचा परिणाम जाणवत असल्याचे चित्र आहे. प्रशांत महासागरात एल निनो सक्रिय झाल्याने पावसाच्या वितरणावर परिणाम होत आहे. ऑगस्ट महिन्यात राज्यात अपेक्षेप्रमाणे पाऊस झाला नाही. आता सप्टेंबरमध्येही सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज असल्याने शेतकऱ्यांसमोरील संकट कायम आहे. दरम्यान, मध्य उत्तर प्रदेशात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले असून, समुद्रसपाटीपासून सुमारे ३.१ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती निर्माण झाली आहे.

राज्यातील काही भागांमध्ये पावसाअभावी परिस्थिती गंभीर बनली आहे. अनेक ठिकाणी पिकांची वाढ खुंटली असून पाणीपातळीतही घट होत आहे. त्यामुळे राज्यावर दुष्काळाचे सावट गडद होत असल्याची चिंता व्यक्त केली जात आहे. जुलै महिन्यात चांगला पाऊस झाल्यानंतर आता पावसाने पुन्हा मोठी विश्रांती घेतली आहे. मात्र, चार दिवसांनंतर काही भागांत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.


दरम्यान, परभणीचे खासदार संजय जाधव यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र पाठवून परभणी आणि जालना जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली आहे. गेल्या ४० ते ४५ दिवसांपासून पाऊस नसल्याने पिके सुकत असून, शेतकऱ्यांनी लागवडीसाठी केलेला खर्चही वाया जाण्याची परिस्थिती निर्माण झाल्याचे त्यांनी पत्रात नमूद केले आहे.
पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यास शेतकऱ्यांसमोर उदरनिर्वाह आणि कर्जफेडीचा गंभीर प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे दोन्ही जिल्ह्यांतील पिकांची तातडीने पाहणी करून दुष्काळ जाहीर करावा आणि शेतकऱ्यांना त्वरित मदत द्यावी, अशी मागणी खासदार जाधव यांनी केली आहे. पीक विमा, दुष्काळी सवलती तसेच शासनाच्या इतर मदतीचा लाभही तातडीने देण्याची मागणी त्यांनी केली आहे.
दरम्यान, खरीप हंगामातील महत्त्वाचे पीक असलेल्या बाजरीलाही पावसाच्या खंडाचा मोठा फटका बसला आहे. पेरणीला जवळपास दोन महिने उलटूनही पुरेसा पाऊस न झाल्याने पिकांची वाढ खुंटली आहे. काही भागांत बाजरीला कणसे आली असली तरी त्यामध्ये दाणे भरलेले नसल्याने शेतकऱ्यांची चिंता अधिकच वाढली आहे.