Maharashtra : दिवाळीचा गोडवा अजूनच वाढणार! राज्यात २५ ऑक्टोबरपासून मिळणार आनंदाचा शिधा..
Maharashtra : शेतकरी आत्महत्याग्रस्त १४ जिल्ह्यांसह राज्यातील एक कोटी ५८ लाख ३३ हजार ७१८ शिधापत्रिकाधारकांचा दिवाळीचा गोडवा अधिक वाढावा याकरिता राज्य सरकारने सलग दुसऱ्या वर्षी १०० रुपयांमध्ये ‘आनंदाचा शिधा’ संच देण्याचा निर्णय घेतला आहे.
सहा वस्तू असलेला हा ‘आनंदाचा शिधा’ २५ ऑक्टोबरपासून लाभार्थ्यांना वितरित केला जाणार असून, ३० नोव्हेंबरपर्यंत तो रेशन दुकानांतून विकत घेता येईल. याकरिता नागपूर आणि पुण्यातील दोन पुरवठादार नियुक्त करण्यात आले आहेत.
सर्वसामान्य व गरीब जनतेचा सणांचा गोडवा अधिक वाढावा, याकरिता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘आनंदाचा शिधा’ ही संकल्पना राबविण्यास सुरुवात केली.
मागील महिन्यात गौरी-गणपती काळातही लाभार्थ्यांना शंभर रुपयांत साखर, तेल, रवा व डाळ अशी प्रत्येकी एक किलोप्रमाणे ‘आनंदाचा शिधा संच दिला होता.
गेल्यावर्षी दिवाळीत दिलेल्या ‘आनंदाचा शिधा’ संचामध्ये यावर्षी पोहे व मैदा या अधिकच्या दोन वस्तूंसह सहा वस्तू दिल्या जाणार असल्याने गरीब व सर्वसामान्यांच्या दिवाळी फराळातील गोडवा अधिक रूचकर बनेल.
‘आनंदाचा शिधा’ हा २५ ऑक्टोबरपासून रेशन दुकानांवर लाभाथ्र्यांना उपलब्ध व्हावा, याकरिता नागपूरमधील जस्ट किचन व पुण्यातील इंडो अलाईड प्रोटिन फूड या दोन पुरवठादार कंपन्यांना ठेका देण्यात आला आहे.
साखर, चनाडाळ, पोहे, खाद्यतेल हे कमीत कमी चार महिने आणि मैदा व रवा या वस्तू किमान तीन महिने खराब होणार नाहीत, याची काळजी घेण्याची सूचनाही सरकारने देऊन दर्जेदार वस्तूंचा आग्रह धरला आहे.
दिवाळीतील ‘आनंदाचा शिधा’ लाभार्थी…
जिल्हा लाभार्थी
मुंबई ९,३४, ४०३
ठाणे ७,७०,६५४
पालघर ३,८१,६११
रायगड ४,३०,०८१
रत्नागिरी २,५३, १४४
सिंधुदुर्ग १,५६,३४६
कोल्हापूर ५,६५,७९६
सांगली ४,०६,७६०
सातारा ३,९३, २४२
पुणे ९,००, ४०५