शेतात दबा धरुन बसलेल्या बिबट्याची तरुणीवर झडप, २० वर्षांच्या मुलीचा क्षणातच बापासमोरच अंत…

नाशिक : शेतात गवत कापण्यासाठी गेलेल्या २० वर्षीय युवतीचा बिबट्याने केलेल्या हल्ल्यात मृत्यू झा;झाल्याची घटना दिंडोरी तालुक्यातील वनारवाडी शिवारात घडली. पायल राजेंद्र चव्हाण असे बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यु झालेल्या मुलीचे नाव आहे. मुलीचा आरडाओरडा ऐकून वडीलांनी तिला वाचवण्यासाठी धाव घेतली, परंतु बिबट्याने मुलीचे लचके तोडत तीला ठार केले. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.
नाशिक दिंडोरी मार्गावरील वानरवाडी गावाजवळ राजेंद्र चव्हाण शेतात काम करत होते. गुरांना चारा मिळावा यासाठी पायल ऊसाच्या शेतालगत असलेले गवत कापत होती. त्याचवेळी शेतात आधीपासूनच दबा धरुन बसलेल्या बिबट्याने मागून येऊन पायलवर हाल केला. बिबट्याने शिवारातच तिला नेले, यावेळी मुलीच्या किंकाळ्या ऐकू आल्याने तिच्या वडिलांनी आणि आजुबाजूच्या शेतकऱ्यांनी त्याठिकाणी धाव घेतली.
नंतर बिबट्याने पायलला तसेच सोडून पळ काढला. पायलला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. परंतु तेथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. यामुळे वनविभागाच्या कारभारावर संताप व्यक्त केला आहे. या परिसरात अनेकवेळा बिबट्यांचा मुक्तसंचार दिसून आला आहे. वनविभागाकडून दुर्लक्ष केल्याने ही घटना घडल्याचे गावकऱ्यांनी म्हटले.
या घटनेमुळे चव्हाण कुटुंबावर दुखःचा डोंगर कोसळला आहे. या घटनेनंतर गावकऱ्यांनी हळहळ व्यक्त करत वनविभागावर संताप व्यक्त केला आहे. परिसरात सातत्याने बिबट्याचे दर्शन होत जनावरांवर आणि माणसांवर हल्ले होत आहेत. यामुळे याठिकाणी बाहेर पडणे देखील अवघड झाले आहे. यामुळे याकडे शासनाने लक्ष देण्याची मागणी केली जात आहे.
दरम्यान, काही महिन्यांपूर्वी एका गुराखी मुलाचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला होता. मात्र वनविभाग उपाययोजना करत नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. वनविभागाने पिंजरे लावत बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. २० वर्षिय पायल चव्हाण नाशिकच्या मविप्र महाविद्यालयात शिक्षण घेत होती. ती अभ्यासात देखील हुशार होती.