भारतात कोरोना व्हायरस चे थैमान सुरूच ; दिवसभरात रुग्णसंख्येत 40 टक्क्यांनी वाढ…!

नवी दिल्ली : भारतात कोरोना व्हायरसने थैमान घातल्याने दिवसागणिक त्याच्या रुग्णांच्या संख्येत भर पडत आहे. तसेच देशभरातील वैद्यकिय कर्मचारी, डॉक्टर्स आणि नर्स दिवसरात्र कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करत आहेत.
यातच, गेल्या 24 तासांत देशात कोविड-19 प्रकरणांमध्ये 40 टक्क्यांनी वाढ झाली आहे. एका दिवसात कोविडची 3,016 नवीन प्रकरणे नोंदवली गेली आहेत. त्यामुळे ही एक चिंताजनक बाब आहे.
आता देशातील कोरोना संक्रमित लोकांची संख्या 44,712,692 झाली आहे. गेल्या सहा महिन्यांत नोंदवलेल्या दैनंदिन प्रकरणांची ही सर्वाधिक संख्या आहे. त्याचबरोबर उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 13,509 वर गेली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने गुरुवारी सकाळी जारी केलेल्या आकडेवारीनुसार, भारतात संसर्गाचा दैनंदिन दर 2.73 टक्के आहे आणि साप्ताहिक दर 1.71 टक्के आहे.
ताज्या आकडेवारीनुसार, देशात सध्या 13,509 कोरोनाबाधित लोकांवर उपचार चालू आहेत. जे एकूण प्रकरणांपैकी 0.03 टक्के आहे. रुग्णांच्या बरे होण्याचा राष्ट्रीय दर 98.78 टक्के आहे. आतापर्यंत एकूण 4,41,68,321 लोक कोरोनामुक्त झाले आहेत, तर कोविड-19 मुळे मृत्यूचे प्रमाण 1.19 टक्के आहे.