महाराष्ट्रावर हवामानाचा डबल अटॅक! 23 जिल्ह्यांना पावसाचा इशारा, तर मुंबईसह कोकणात उष्णतेचा तडाखा

पुणे : मे महिन्याच्या अखेरीस महाराष्ट्रातील वातावरणाने अचानक आक्रमक रूप धारण केले असून राज्यातील तब्बल 23 जिल्ह्यांसाठी हवामान विभागाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. एका बाजूला विदर्भात मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि मुसळधार पावसाचा धोका वाढला आहे, तर दुसऱ्या बाजूला मुंबईसह कोकण किनारपट्टीला उष्ण आणि दमट हवामानाचा फटका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांना पुढील 24 तास विशेष सावध राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, राज्यात मान्सूनपूर्व पावसाच्या हालचालींना वेग आला असून अनेक भागांत ढगांची गर्दी वाढत आहे. विशेषतः विदर्भ विभागात पावसाचा सर्वाधिक प्रभाव दिसून येणार आहे. अकोला, अमरावती, बुलढाणा, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ या 11 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. या भागांत विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस आणि वादळी वाऱ्यांची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
उत्तर महाराष्ट्रातही वातावरण अस्थिर राहणार असून धुळे, नंदुरबार, जळगाव आणि नाशिक जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. काही ठिकाणी मेघगर्जनेसह मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. शेतकऱ्यांनी शेतीची कामे आणि पिकांची काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, हिंगोली, नांदेड आणि परभणी जिल्ह्यांमध्येही हवामानाचा बदल जाणवणार आहे. या भागांत तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता असून विजांच्या कडकडाटाचाही इशारा देण्यात आला आहे.

दरम्यान, कोकण विभागात वेगळेच चित्र पाहायला मिळत आहे. ठाणे, मुंबई, रायगड आणि रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये उष्णतेचा यलो अलर्ट कायम ठेवण्यात आला आहे. उष्ण आणि दमट हवामानामुळे नागरिकांना त्रास होण्याची शक्यता असल्याने दुपारच्या वेळेत अनावश्यक बाहेर पडणे टाळण्याचा सल्ला प्रशासनाने दिला आहे.
राज्यात एकीकडे पावसाचा इशारा तर दुसरीकडे उष्णतेचा तडाखा अशा दुहेरी संकटाचा सामना नागरिकांना करावा लागू शकतो. त्यामुळे हवामान विभागाच्या सूचनांकडे दुर्लक्ष न करता आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.