राज्यात उष्णतेची लाट आणि मेघगर्जनेसह पावसाचा इशारा, वाचा हवामान खात्याने दिलेला इशारा…

पुणे : राज्यात उष्णतेमुळे नागरिक हैराण झाले असून अशातच आता पश्चिम महाराष्ट्रातील हवामानाने पुन्हा एकदा अनपेक्षित कलाटणी घेतली असून अवकाळी पाऊस आणि उष्णतेचा दुहेरी धोका निर्माण झाला आहे.
हवामान विभागाने पुढील २४ तासांसाठी अलर्ट जारी केला आहे. काही जिल्ह्यांमध्ये उन्हाचा चटका जाणवतो आहे, तर काही ठिकाणी हलक्या पावसासह गारपीटीची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
दरम्यान, राज्याच्या विविध भागांमध्ये तापमानात मोठी चढ-उतार पाहायला मिळत असून, पुणे, सातारा, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांतील नागरिकांनी विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
पुण्यात मागील २४ तासांत ४०.८ अंश सेल्सिअस इतकं तापमान नोंदवलं गेलं आहे. आज, १७ एप्रिल रोजी कमाल तापमान ४१ अंश, तर किमान तापमान २० अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे. आकाश निरभ्र राहील, मात्र उन्हाचा तडाखा अधिक तीव्र जाणवेल.
साताऱ्यात वातावरणात अंशतः ढगाळपणा राहणार असून संध्याकाळनंतर विजांच्या कडकडाटासह हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. काल ४०.२ अंश तापमानाची नोंद झाली असून पुढील २४ तासांत कमाल तापमान ४१ अंश आणि किमान तापमान १९ अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे.
दरम्यान, सांगली जिल्ह्यात तापमानात मोठी वाढ झाली आहे. पुढील 24 तासांत येथे कमाल तापमान ४१ अंश आणि किमान तापमान २४ अंश सेल्सिअस इतकं राहण्याची शक्यता आहे. दुपारनंतर आकाश अंशतः ढगाळ होण्याची शक्यता असून, गरज नसताना घराबाहेर पडण्याचे टाळावे, असा सल्ला देण्यात आला आहे.