दौड- मनमाड रेल्वे दुहेरीकरणास मिळणार गती, आता उखळगाव येथील 3.30 हेक्टर राखीव वनजमिनीच्या हस्तांतरणास मंजुरी…

दौंड : उखळगाव (ता. श्रीगोंदा) येथे दौंडमनमाड रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण करण्यासाठी 3.30 हेक्टर राखीव वनजमिनीचे हस्तांतरण केंद्र सरकारच्या पर्यावरण, वन व जलवायू परिवर्तन मंत्रालयाच्या मंजुरीनंतर अधिकृतपणे मान्य करण्यात आले आहे.

या कामासाठी केंद्र शासनाने वन (संवर्धन) अधिनियम, 1980 च्या कलम 2 अंतर्गत 27 अटींच्या अधीन राहून तत्वतः मान्यता दिली असल्याची माहिती उप मुख्य अभियंता (बांधकाम) सागर चौधरी यांनी दिली.उप वनसंरक्षक (वन्यजीव) पुणे यांनी संबंधित प्रकल्प यंत्रणेकडून सर्व अटींची पूर्तता झाल्याची खात्री करून अहवाल पाठविला होता.
नागपूर येथील अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक व केंद्रस्थ अधिकारी यांनी काही मुद्यांची पूर्तता मागितली होती, त्यानंतर तीही पूर्ण करण्यात आली. प्रकल्प यंत्रणेकडून पर्यायी वनीकरणाचा खर्च, नक्त वर्तमान मूल्य (एनपीए), वन्यजीव संवर्धन आराखडा यासाठी आवश्यक कॅम्पा निधी जमा केला गेला आहे.

मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव), पश्चिम मुंबई यांचेकडून कार्यारंभ आदेश (जा.क्र. कक्ष-3/जमीन //प्र.क्र. 108/ 998/2025-26 दिनांक 21/07/2025) डॉ. जितेंद्र रामगांवकर, मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव), पश्चिम मुंबई यांनी उप मुख्य अभियंता (निर्माण), दौंड यांना प्रकल्प सुरू करण्याची कार्यारंभ परवानगी काही अटींवर दिली आहे.
दरम्यान, सदर अटी मध्ये केंद्र व राज्य शासनाच्या तत्वतः मंजुरीतील अटींचे पूर्ण पालन करणे, वन्यजीव संवर्धन आराखडा आणि ॲनिमल पॅसेज प्लानची प्रभावी अंमलबजावणी, प्रकल्पांतर्गत वृक्षतोड करता येणार नाही, मजुरांचे तात्पुरते निवास शेड वनक्षेत्रात उभारता येणार नाहीत, आदेश 1 वर्षासाठी वैध राहील, आदेशाची प्रत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सूचना फलकावर लावण्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. तर प्रकल्प कार्यान्वयनात वन (संवर्धन) अधिनियमाचे उल्लंघन झाल्यास कठोर वैधानिक कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे.