रोजची पेनकिलर ठरू शकते ‘स्लो पॉइझन’! हृदय, किडनी, आतड्यांवर गंभीर परिणाम; डॉक्टरांनी दिला मोठा इशारा

मुंबई : डोकेदुखी झाली की एक गोळी, कंबर दुखली की दुसरी गोळी, ताप आला की लगेच पेनकिलर… धावपळीच्या जीवनशैलीत वेदनाशामक गोळ्या अनेकांच्या रोजच्या सवयीचा भाग बनल्या आहेत. मात्र तात्पुरता आराम देणाऱ्या या गोळ्या शरीराला आतून किती मोठं नुकसान पोहोचवू शकतात, याबाबत तज्ज्ञ डॉक्टरांनी गंभीर इशारा दिला आहे. विशेषतः डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय दररोज पेनकिलर घेण्याची सवय हृदय, किडनी, यकृत आणि पोटासाठी धोकादायक ठरू शकते.

वैद्यकीय तज्ज्ञांच्या माहितीनुसार, सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या वेदनाशामक औषधांमध्ये आयबुप्रोफेन, डायक्लोफेनॅक आणि नॅप्रॉक्सेन यांसारख्या औषधांचा समावेश होतो. या औषधांचा दीर्घकाळ वापर केल्यास पोटात जळजळ, अॅसिडिटी, अल्सर आणि अंतर्गत रक्तस्त्रावाचा धोका वाढतो. तसेच मधुमेह, उच्च रक्तदाब किंवा वयोमान वाढलेल्या रुग्णांमध्ये किडनी निकामी होण्याची शक्यता अधिक असल्याचं डॉक्टर सांगतात.
याशिवाय सतत पेनकिलर घेतल्याने रक्तदाब वाढणे, हृदयविकाराचा झटका येणे किंवा यकृतावर ताण येणे असे गंभीर दुष्परिणामही दिसून येतात. विशेषतः पॅरासिटामॉल मर्यादित प्रमाणात सुरक्षित मानले जात असले तरी जास्त प्रमाणात घेतल्यास यकृताला गंभीर इजा पोहोचू शकते.

डोकेदुखीसाठी वारंवार गोळ्या घेणाऱ्यांमध्ये “औषधांमुळे होणारी डोकेदुखी” हा वेगळाच आजार निर्माण होत असल्याचंही तज्ज्ञांनी स्पष्ट केलं आहे. म्हणजेच ज्या गोळ्या आरामासाठी घेतल्या जातात, त्याच पुढे कायमस्वरूपी त्रासाचं कारण बनू शकतात.

डॉक्टरांच्या मते, कोणतीही पेनकिलर पूर्णपणे सुरक्षित नसते. मात्र योग्य प्रमाणात आणि कमी कालावधीसाठी घेतल्यास काही पर्याय तुलनेने सुरक्षित ठरतात. दुखऱ्या भागावर लावायचे जेल, स्प्रे किंवा पॅचेस हे गोळ्यांपेक्षा अधिक सुरक्षित मानले जातात, कारण त्यांचा थेट पोट किंवा किडनीवर परिणाम होत नाही.
तज्ज्ञांनी काही महत्त्वाच्या खबरदारीचाही सल्ला दिला आहे. रिकाम्या पोटी वेदनाशामक गोळ्या घेऊ नयेत, डॉक्टरांनी सांगितलेल्या डोसपेक्षा जास्त औषध घेऊ नये आणि दोन वेगवेगळ्या पेनकिलर एकत्र घेणं टाळावं. तसेच मद्यपानासोबत अशा गोळ्या घेणं अत्यंत घातक ठरू शकतं.
दरम्यान, तज्ज्ञांनी वेदनांवर कायमस्वरूपी उपाय म्हणून फिजिओथेरपी, योग, नियमित व्यायाम, योग्य पोश्चर, गरम किंवा थंड शेक आणि संतुलित आहार यांचा सल्ला दिला आहे. “वेदना हा शरीराचा इशारा असतो. गोळी घेऊन तो दाबण्यापेक्षा मूळ कारण शोधणं अधिक महत्त्वाचं आहे,” असा सल्लाही डॉक्टरांनी दिला आहे.