उरुळीकांचन ‘ला गणेश आगमनाचा नागरीकांना प्रचंड मनस्ताप ! डीजेचा नियमबाह्य दणदणाटाने नागरीक पहिल्या दिवशीच हैराण ! डोकेदुखी, बधीरपणाचे नागरीकांना निमंत्रण ..!!!

जयदीप जाधव
उरुळीकांचन : उरुळीकांचन नगरीत सार्वजनिक गणेश मंडळांनी यंदाच्या गणेशोत्सवात गणरायाचे आगमन नागरीकांना प्रचंड मनस्ताप देऊन केले आहे.गणेश मंडळांनी यंदा गणरायाच्या आगमनाच्या मिरवणुकीत डीजेचा नियमबाह्य मोठ्या कर्णकर्कश थयथयाट केल्याने या प्रकाराने नागरीकांना प्रचंड संतापास सामोरे जावे लागले असून वयोवृद्ध नागरीकांसह हृदयदाबाचा त्रास असलेल्या नागरीकांना मोठा त्रास सहन करावा लागला असून डीजेच्या दणदणाटाच्या आवाजाचे प्रमाण मोडून तसेच वेळेची प्रमाणवेळ मोडून दणदणाट करणाऱ्या मंडळांवर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थ करु लागले आहेत.
गणेशोत्सव काळात उत्सवाचे वेगळेपण जपणाऱ्या उरुळीकांचन शहरात सार्वजनिक गणेश मंडळांनी यंदा गणेशाचे आगमन मात्र अतिशय आक्राळ -विक्राळ स्वरूपात मिरवणूका काढून केले आहे.या मिरवणुकांत शहरातील तब्बल १८ मंडळांनी महाकाय डीजे साऊंड सिस्टीम लावून गणरायाचे आगमन केले आहे. हे आगमन करताना गणेश मंडळाची जणू काही एकमेकांशी स्पर्धा लागली आहे काय ? अशा इर्षेतून या डिजेचा दणदणाट नागरीकांच्या त्रासात भर घालित होता. गणेश मंडळांनी डिजेची आवाजाची ७५ डेसीबल मर्यादा ओलांडून कर्कश आवाजाचा कळस गाठला होता.
गणेश मंडळांनी शहरात नागरीकांना आवाजाचा त्रास होऊ नये अशी मर्यादा पाळणे गरजेचे असताना अतिशय बेफामपणे
आगमन मिरवणूका काढून नागरीकांच्या त्रासात भर घातली आहे. गणेश मंडळांनी रात्री १० नंतरचा ध्वनीक्षेप बंद करण्याचा नियम मोडीत काढून डीजेचा बेफामपणा सुरू ठेवला होता. या संपूर्ण प्रकाराचा शहरातील लहान मुले, अबाल वृद्ध नागरीकांना प्रचंड प्रमाणात मनस्ताप झाला आहे. काही ह्दयदाब त्रास असणाऱ्या नागरीकांनी या बेफामपणावर नाराजी व्यक्त केली आहे. तर काही मध्यवयीन व तरुण नागरीकांना बधीरपणा , रात्रभर डोकेदुखीचा त्रास सहन करावा लागला आहे. तर काही भागात घरांच्या दर्जा खिळखिळ्या करुन टाकल्या आहेत. या संपूर्ण आगमन मिरवणुकीचा शहरातील नागरीकांना सलग काही तास त्रास सोसावा लागला असून या उत्सवाच्या नावावर बेफीकीर वागणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी उरुळीकांचन शहरात दिवसभर सुरू होती.
राजकीय मंडळींचे मौन !
उरुळीकांचन शहरात या बिघडत चाललेल्या रिवाजाला आवर घालण्यासाठी कोण राजकीय मंडळी पुढे येत नसल्याची
विदारक परिस्थिती शहर उघड्या डोळ्यांनी पाहत आहे. राजकीय मान्यवर मंडळी अशा प्रकारांना आळा घालण्याऐवजी भर घालीत असल्याचा काही प्रकार नागरीक बोलत आहे. राजकीय मंडळी फक्त राजकीय बांधलकी बाळगत असल्याने नागरीकांनी अशा समस्या कोणापुढे मांडव्यात हा खरा प्रश्न निर्माण झाला आहे.
“शहरातील गणेश मंडळांना गणेश उत्सव साजरा करण्यापूर्वी सामुहीक बैठकीत सर्व सूचना व नियमांना काटेकोर
पालन करण्याचे सूचित केले आहे. उत्सवातून नागरीकांना बाधा होईल असे कृत्य केल्यास कठोर कारवाई करण्याचे सूचित केले आहे. नियमबाह्य पध्दतीने डीजे वाजविणारे मंडळांवर कारवाई करण्यात येणार आहे.उत्सव काळात कायदा मोडणाऱ्यांची गय केली जाणार नाही “
–शंकर पाटील , पोलिस निरीक्षक, उरुळीकांचन पोलिस ठाणे