इर्शाळवाडी दुर्घटना: दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना पाच लाखांची मदत, मुख्यमंत्री शिंदे यांची घोषणा..

मुंबई : रायगडमधील खालापूर तालुक्यातील इर्शाळवाडी गावावर बुधवारी (ता. १९) रात्री उशिरा दरड कोसळली. या दुर्घटनेत आतापर्यंत ५ जणांचा मृत्यू झाला असून अनेकजण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. ७५ जणांना सुखरुप बाहेर काढण्यात यश आलं आहे.
तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे घटनास्थळी पोहोचले असून त्यांनी मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांच्या कुटुंबीयांना सरकारकडून प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. तसेच जखमींचा सर्व खर्च राज्य सरकार करणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.
मिळालेल्या माहिती नुसार, एकूण ४८ कुटुंब इथे आहेत. सुमारे ७५ जणांना बाहेर काढण्यात यश आले असून ५ जणांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. जखमींवर तातडीनं उपचाराची व्यवस्था करण्यात आली आहे. गावातील १५ ते १७ घरं मलब्याखाली दबली गेली आहेत. एनडीआरएफ, एसडीआरएफ व स्थानिक बचाव दल घटनास्थळी बचाव कार्य करत आहेत.
पण, या भागात जेसीबी पोकलन येऊ शकत नसल्याने त्यामुळे फक्त मानवी स्तरावर बचावकार्य सुरू आहे. हेलिकॉप्टर आम्ही तैनात ठेवले आहेत, असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले. दरडग्रस्त यादीत हे गाव नव्हते. दरडग्रस्त गावातील लोकांना आपण स्थलांतरीत करतो.
पण हे गाव नसल्याने आपण येथील लोकांना स्थलांतरीत केलेले नव्हते. हे गाव त्या यादीत का नव्हते, कुणाची चूक या सर्व गोष्टीची नंतर चौकशी होईलच. या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना पाच लाख रुपयांची मदत देऊ, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी जाहीर केले.