महिला वकील मारहाण प्रकरणी अखेर सरपंचासह दहा जणांवर गुन्हा दाखल, घटनेचा राज्यभरात तीव्र निषेध….

बीड : येथील अंबाजोगाई तालुक्यातील वकील महिला मारहाण प्रकरणी आता कारवाईला वेग आला आहे. अंबाजोगाई सत्र न्यायालयात वकिली करणाऱ्या ज्ञानेश्वरी अंजान या तरुणीला गावाचा सरपंच आणि त्याच्या कार्यकर्त्यांनी बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली होती. यावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात होत्या.
आता या प्रकरणी आता पोलिसांनी कारवाई करत मारहाण प्रकरणी सरपंचासह दहा जणांवर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस तपास करत आहेत. यामध्ये सरपंच अनंत रघुनाथ अंजान यांच्यासह सुधाकर रघुनाथ अंजान, राजकुमार ज्ञानोबा मुंडे, कृष्णा ज्ञानोबा मुंडे, ज्ञानोबा बब्रुवान रपकाळ, नवनाथ ज्ञानोबा जाधव, मृत्युंजय पांडुरंग अंजान, अंकुश बाबुराव अंजान, सुधीर राजाभाऊ मुंडे, नवनाथ दगडू मोरे या दहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट केल्यानंतर हा सर्व प्रकार समोर आला होता. तसेच आमदार रोहित पवार यांनी देखील याबाबत एक पोस्ट केली होती. यामध्ये ते म्हणाले, अंबाजोगाई येथे एका महिला वकीलाला अत्यंत भयंकर आणि क्रूर पद्धतीने रिंगण करून केलेली मारहाण म्हणजे राज्याच्या कायदा-सुव्यवस्थेचे उडालेले धिंडवडे आहेत.
एक झालं की दुसरं मारहाण, हत्या, अत्याचाराचं प्रकरण दररोज समोर येत असताना सरकार मात्र सगळं काही सुरळीत चाललंय याच मानसिकतेत वावरतंय. गुंड मोकाट आणि गुन्हेगारी सुस्साट अशी राज्याची झालेली अवस्था ही अराजकता माजल्याचे लक्षण नाही का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.
गुन्हेगारीवर आणि कायदा व सुव्यवस्थेवर सरकार तर जबाबदारीने उत्तर देणार नाही पण बीडचे पालकमंत्री म्हणून अंबेजोगाई येथील घटनेबाबत अजितदादा ठोस कारवाई करतील, ही अपेक्षा! अशी पोस्ट त्यांनी केली आहे. दरम्यान, या प्रकरणाचा अधिक तपास सध्या पोलिस करत आहेत.