इंदापूरच्या विवाहितेची बॉडी नाशकात, तीन महिन्यांनी गूढ उकललं, पतीनेच घेतला पत्नीचा जीव, धक्कादायक कारण आले समोर..

इंदापूर : पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील कळाशी येथील २६ वर्षीय विवाहित महिलेचा पतीनेच खून केल्याची घटना घडली आहे. विशेष बाब म्हणजे तीन महिन्यांपूर्वी सदर महिला बेपत्ता असल्याची तक्रार पतीनेच दिली होती.
याप्रकरणी महिलेचा पती जोतीराम आबा करे आणि त्याचा मित्र दत्तात्रय शिवाजी गोलांडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करत त्यांना अटक करण्यात आली आहे.
त्यामुळे तब्बल तीन महिन्यानंतर या खुनाचा उलघडा झाला आहे. यामध्ये पतीनेच तिचा खून करून मृतदेह नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यातील ढेकुगाव ते परधाडी घाटात निर्जनस्थळी टाकून दिल्याचं इंदापूर पोलिसांनी केलेल्या तपासात निष्पन्न झाले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, २९ जानेवारी २०२५ रोजी प्रियंका जोतीराम करे (वय-२६ वर्षे, रा. कळाशी, ता. इंदापूर) या बेपत्ता झाल्याची तक्रार इंदापूर पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. त्यानंतर इंदापूर पोलिसांनी सखोल तपास करीत पुढे आलेल्या माहितीवरून, सुधीर भिमराव काळे (वय-४१ वर्षे, पोलिस हवालदार, इंदापूर पोलिस ठाणे) यांनी फिर्याद दिली.
या फिर्यादीनुसार २७ जानेवारी २०२५ रोजी रात्री १० वाजताच्या सुमारास जोतीराम आबा करे (वय-३४ वर्षे, रा. कळाशी ता. इंदापूर) व दत्तात्रय शिवाजी गोलांडे (रा. गोलांडे वस्ती, इंदापूर, ता. इंदापूर) यांनी संगनमताने मौजे कळाशी, ता. इंदापूर गावचे हददीत राहते घरी बेपत्ता महीला प्रियंका जोतीराम करे (वय-२६ वर्षे, रा. कळाशी, ता. इंदापूर) हिच्या चारित्र्यावर संशय घेऊन, तुझे वागणे बरोबर नाही, त्यामुळे आमची नातेवाईक व जनमाणसात बदनामी होत आहे, असे म्हणून गळा दाबून तिची जीव घेतला.
दरम्यान, त्यानंतर चारचाकी वाहन (क्र.एम. एच.१४ डी ए ८९७२) मध्ये टाकून २८ जानेवारी २०२५ रोजी पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यातील मौजे ढेकुगाव ते परधाडी घाटात निर्मनुष्य असलेल्या ठिकाणी मृतदेह टाकून देऊन पुरावा नष्ट केला. यावरून वरील आरोपी विरुद्ध सरकारतर्फे फिर्यादी यांनी गुन्हा दाखल केला आहे.