विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! आता वर्षातून २ वेळा होणार दहावीची बोर्ड परीक्षा, सीबीएसई बोर्डाचा निर्णय..

मुंबई : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अर्थात सीबीएसईने मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार आता इयत्ता दहावीची वर्षातून दोन वेळा परीक्षा होणार आहे. गेल्या काही दिवसांपासून या निर्णयाबाबत चर्चा चालू होती. मात्र आता याबाबतचा निर्णय सीबीएसईने जाहीर केला आहे.
आता इयत्ता दहावीची बोर्ड परीक्षा वर्षातून दोन वेळा घेतली जाणार आहे. हा निर्णय २०२६ पासून लागू होणार असून विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी अधिक संधी उपलब्ध होणार आहे.
तसेच सीबीएसईच्या नव्या धोरणानुसार, इयत्ता १० वीच्या परीक्षा फेब्रुवारी आणि मे महिन्यांमध्ये घेतल्या जातील. याचा उद्देश विद्यार्थ्यांना त्यांच्या क्षमतेनुसार सर्वोत्तम कामगिरी करण्याची संधी देणे आहे. परीक्षेतील सर्वोत्तम निकाल ग्राह्य धरण्यात येणार आहे.
CBSE ने या नव्या धोरणाचा उद्देश स्पष्ट करताना म्हटलं की, विद्यार्थ्यांवरील तणाव कमी करणे, चुकांमधून शिकण्याची संधी देणे आणि सतत मूल्यांकनाला चालना देणे हा या बदलामागचा मुख्य हेतू आहे. यामुळे एकाच परीक्षेच्या दडपणात विद्यार्थी अडकणार नाहीत, तसेच शिक्षण अधिक लवचिक होईल.
सीबीएसईने राष्ट्रीय शिक्षण धोरणानुसार हा निर्णय घेतला आहे. विद्यार्थ्यांच्या डोक्यावरचं परीक्षेचं ओझं कमी व्हावं त्यामुळे हे धोरण स्वीकारण्यात आलं आहे. आता या नव्या धोरणानुसार विद्यार्थ्यांना दोन वेळा बोर्डाची परीक्षा देता येईल.
फेब्रुवारी महिन्यात घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल हा एप्रिल महिन्यात जाहीर केला जाईल. तर मे महिन्यात घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल हा जून महिन्यात जाहीर केला जाईल. दुसऱ्या परीक्षेत विद्यार्थी एकूण तीन विषयात आपले गुण वाढवण्यासाठी प्रयत्न करू शकतात. या विषयांत विज्ञान, गणित, सोशल सायन्स आणि भाषा विषयांचा समावेश आहे.