भिगवणला कार उलटून तिघे ठार ! एक जण गंभीर जखमी ! पहाटेची घटना…!

भिगवण : इंदापूर तालुक्यातील भिगवण येथे कारचा भीषण अपघात झाला असून त्यात तिघांचा जागीचमृत्यू झाला आहे. चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटून कारने पलटी खाल्ली त्यात तिघांचा जागेवरच मृत्यू झाला आहे तर एक व्यक्ती गंभीर जखमी झाला आहे.
संदिप राजाभाऊ माळी (वय – ३५,रा. रा. गातेगाव ता. जि लातुर), बालाजी केरबा तिडके (वय – ४८ रा. महावीर सोसायटी, लातुर ता. जि लातुर) सरस्वती राजाभाऊ माळी वय- ६१,रा. गातेगाव ता. जि. लातुर) अशी अपघातात मृत्यू झालेल्या तिघांची नावे आहेत. तर चंद्रकांत रामकिसन गवळी वय – ५४ व्यवसाय नोकरी रा. दिपज्योतीनगर ता. जि. लातुर असे जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी पहाटे पावणेचारच्या दरम्यान पुणे – सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर सोलापूर – पुणे या लेनवर इंदापूर तालुक्यातील डाळज नं. १ गावाच्या हद्दीत ही स्विफ्ट कार वेगात जात होती. गाडीचा वेग खूपच जास्त होता. त्यामुळे चालकाचे कारवरील नियंत्रण सुटून कारने तीनवेळा पलटी मारली.
दरम्यान, कार क्र. एम एच ४३ बी एन १४०२ असा कारचा नंबर असून ती पुण्याच्या दिशेने येत होती. भिगवण बस स्थानकापासून काही अंतरावर हा अपघात झाला आहे. या अपघातामध्ये कारमधील तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे, तर एक जण जखमी झाला आहे. या जखमी व्यक्तीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.