तरुणीचा जीव वाचवणाऱ्या पुण्यातील तरुणांची जितेंद्र आव्हाड यांच्याकडे एक मागणी, आव्हाड देखील मागणी करणार पूर्ण…

पुणे : पुण्यातील सदाशिव पेठेत एका तरूणीवर भरदिवसा कोत्याने हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली. यामुळे एकच खळबळ उडाली होती. मात्र काही तरुणांनी जीवाची पर्वा न करता तिचा जीव वाचवला.
लेशपाल जवळगे, हर्षद पाटील आणि दिनेश मडावी असे त्यांचे नाव आहेत. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी या मुलांसाठी ५१ हजार रूपयांचे बक्षिस जाहीर केले होते. काल त्यांनी त्या तरूणांची भेट घेतली.
यावेळी आव्हाड म्हणाले, पुण्यात माथेफिरूने केलेल्या हल्ल्यात एका तरुणीचा जीव वाचणाऱ्या तीन जिगरबाज योद्ध्यांना आज भेटलो. लेशपाल जवळगे,हर्षद पाटील,दिनेश मडावी या तीन तरुणांनी आपल्या जीवाची बाजी लावत एका तरुणीचा जीव वाचवला.
इतकंच नव्हे तर हल्ला करणाऱ्या तरुणाचा जीव देखील या युवकांनी वाचवला आहे. छत्रपती शिवाजी महाराज, शाहू, फुले आणि आंबेडकर यांच्या मार्गावर चालणारी ही मुलं आहेत. सदर घटना घडल्यानंतर ते अचानक प्रसिद्धीच्या झोतात आले.
तसेच मी शब्द दिला होता त्याप्रमाणे, तिघांना पारितोषिक दिलं आहे. या तिन्ही मुलांनी एक प्रेमळ आणि हक्काची मागणी केली की, त्यांना पवार साहेबांना भेटायचं आहे..! आणि लवकरच मी त्यांची ही मागणी देखील पूर्ण करणार आहे, असंही जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे.