पुणेकरांनो, शहरात येताय? थांबा! दहीहंडीमुळे वाहतुकीत मोठे बदल; ‘हे’ मार्ग जाणून घ्या..

पुणे : श्रीकृष्ण जयंती आणि दहीहंडी उत्सवानिमित्त पुणे शहरातील विविध भागांत मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी पुणे शहर वाहतूक शाखेने ४ आणि ५ सप्टेंबर रोजी परिस्थितीनुसार वाहतुकीत बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे घराबाहेर पडण्यापूर्वी वाहनचालकांनी वाहतूक बदलांची माहिती घेऊन पर्यायी मार्गाचा वापर करावा, असं आवाहन करण्यात आलं आहे.
फडके हौद परिसरात वाहतुकीत बदल
४ सप्टेंबर रोजी सायंकाळी ४ वाजल्यापासून गर्दी कमी होईपर्यंत फडके हौद परिसरातील काही मार्गांवरील वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे. जिजामाता चौक, सोन्या मारुती चौक, गणेश रोड आणि फडके हौद परिसरातील वाहनांना पर्यायी मार्गाने वळवण्यात येणार आहे.

तसेच ५ सप्टेंबर रोजी सायंकाळी ४ वाजल्यापासून शिवरकर रोडवरील वाहतुकीतही बदल करण्यात येणार आहेत. वाहनचालकांनी संविधान चौक, साळुंखे विहार रोड आणि फ्लॉवर व्हॅली लेन या पर्यायी मार्गांचा वापर करावा.


गर्दीनुसार इतर भागांतही नियमन
लष्कर, वारजे, समर्थ, बंडगार्डन आणि काळेपडळ वाहतूक विभागांच्या हद्दीतही गर्दीच्या परिस्थितीनुसार वाहतुकीचे नियमन करण्यात येणार आहे. काही ठिकाणी वाहतूक एकेरी केली जाऊ शकते, तर गरजेनुसार काही मार्ग तात्पुरते बंद करून वाहनांना पर्यायी मार्गाने वळवण्यात येणार आहे.
सार्वजनिक वाहतुकीचा वापर करण्याचं आवाहन
दहीहंडी उत्सवादरम्यान नागरिकांनी शक्यतो सार्वजनिक वाहतुकीचा वापर करावा. तसेच उपलब्ध पर्यायी मार्गांचा अवलंब करून वाहतूक पोलिसांना सहकार्य करावं, असं आवाहन शहर वाहतूक शाखेचे पोलीस उप आयुक्त डॉ. संदिप भाजीभाकरे यांनी केलं आहे.
जन्माष्टमीनंतरच दहीहंडी का फोडली जाते?
जन्माष्टमीच्या दिवशी भगवान श्रीकृष्णाचा जन्मोत्सव साजरा केला जातो. त्यानंतरच्या दिवशी दहीहंडीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्याची परंपरा आहे. ‘गोविंदा आला रे’च्या जयघोषात मानवी मनोरे रचून उंचावर बांधलेली दहीहंडी फोडली जाते.
दहीहंडी जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशीच का फोडली जाते, यामागे बालकृष्णाच्या बाललीलांशी संबंधित रंजक कथा सांगितली जाते. त्यामुळे या उत्सवाला धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्वही आहे.