पत्रकार मंदार गोंजारींवर गुन्हा दाखल; रोहित पवारांचा सरकारवर घणाघात, म्हणाले- ‘हे तर पत्रकारितेला मिळालेलं मेडल’

पुणे : सत्य समोर आणणे हा पत्रकारितेचा धर्म आहे. हा धर्म निभावल्याबद्दल एबीपी माझाचे पत्रकार मंदार गोंजारी यांच्यावर सीओईपी प्रशासनाने गुन्हा दाखल केला आहे. मात्र, हा गुन्हा नसून त्यांच्या पत्रकारितेला मिळालेला सन्मान असल्याचे मत आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केले.
COEPमधील कथित गैरकारभारासंदर्भातील बातमी समोर आणल्यानंतर पत्रकार मंदार गोंजारी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. या कारवाईमागे नेमका कुणाचा दबाव होता, हे यथावकाश समोर येईल, असा दावा रोहित पवार यांनी केला आहे.

याबाबत बोलताना रोहित पवार म्हणाले की, सत्य मांडणे हे पत्रकाराचे कर्तव्य आहे. पत्रकार मंदार गोंजारी यांनी आपले कर्तव्य बजावल्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून, हा गुन्हा नसून त्यांच्या पत्रकारितेला मिळालेले ‘मेडल’ असल्याचे ते मानतात. तसेच, गोंजारी यांच्या पाठीशी आपण आणि इतर सर्वजण ठामपणे उभे असल्याचेही त्यांनी सांगितले.


“कोणत्याही दबावाला न घाबरता भविष्यातही सत्य मांडत राहा,” असे आवाहनही रोहित पवार यांनी पत्रकार मंदार गोंजारी यांना केले.
या प्रकरणामुळे पुण्यातील शिक्षण क्षेत्रासह पत्रकारिता वर्तुळातही चर्चा सुरू झाली आहे. पत्रकारावरील कारवाईवर विविध स्तरांतून प्रतिक्रिया उमटत असून, COEP प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.