कर्मचाऱ्यांनी झिरवळांकडे ओव्हरलोडची तक्रार, मग तुकाराम मुंढेंनी कर्मचाऱ्यांना थेट इशाराच दिला, नेमकं काय घडलं?

मुंबई : छत्रपती संभाजीनगर येथील राज्य अन्न आणि औषध प्रशासनाच्या प्रयोग शाळेतील 29 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी तुकाराम मुंढे यांच्या कार्यपद्धतीबाबत खात्याचे मंत्री नरहरी झिरवळ यांच्याकडे तक्रार केली आहे. यामुळे या प्रकरणाची राज्यात चर्चा सुरू झाली आहे.
यामध्ये दोन शिफ्टमध्ये काम करण्याचा निर्णय, शनिवार-रविवार आणि सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी काम करण्याचे आदेश, रिक्त पदांमुळे वाढलेला कामाचा ताण तसेच त्यामुळे नमुन्यांच्या तपासणीच्या गुणवत्तेवर परिणाम होण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. याबाबत मंत्र्यांकडे पत्र दिले गेले होते.

यावर संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या सह्याही आहेत. या तक्रारीनंतर तुकाराम मुंढे यांनी आपली भूमिका स्पष्ट करत कर्मचाऱ्यांच्या आक्षेपांना उत्तर दिले. तुकाराम मुंढे म्हणाले, कर्मचाऱ्यांनी माझ्या विरोधात मंत्री महोदयांकडे तक्रार केली की सुट्टी दिली जात नाही, अनेक तास काम करावं लागतं.


मुळात लॅब हे कार्यालय नाही. लॅबची सेवा ही 24 तास चालणारी संस्था असते. इतर शासकीय कार्यालयात वेळ फिक्स असते पण लॅबमध्ये तसं नसते. लॅब ही 24 तास चालू ठेवायची असते, 8 तास नाही. पण याचा अर्थ असा नाही की, कर्मचाऱ्यांनी 24 तास काम करावं. त्यांना 8 तासच काम आपण लावतो, फक्त ते शिफ्टमध्ये आहे, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले आहे.
यामुळे तुकाराम मुंढे यांनी त्यांच्या विरोधात तक्रार करणाऱ्या 29 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना इशारा दिला आहे. ज्यांना शासनाच्या नियमांनुसार काम करायचे नसेल त्यांनी राजीनामा देऊन निघून जावे. त्यामुळे FDA मधील कामकाजाच्या पद्धतीवरून सुरू झालेला वाद आणखी तीव्र होण्याची चिन्हे आहेत.