क्रिकेटमध्ये करिअरचं स्वप्न अधुरं; 17 वर्षीय महिला क्रिकेटपटूची गळफास घेऊन आत्महत्या, मागे सोडलेल्या चिठ्ठीत काय?

नागपूर : क्रिकेटमध्ये मोठे यश मिळवण्याचे स्वप्न पाहणाऱ्या 17 वर्षीय महिला क्रिकेटपटूचा नागपुरात मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. प्राथमिक माहितीनुसार, विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या निवड प्रक्रियेनंतर ती मानसिक तणावात असल्याची माहिती समोर आली आहे.
घटनास्थळी पोलिसांना मिळालेल्या सुसाइड नोटमध्ये “माझं सिलेक्शन झालं नाही…” असा उल्लेख आढळून आल्याने या घटनेने क्रीडा क्षेत्रासह संपूर्ण शहराला हादरा बसला आहे. मात्र, आत्महत्येचे नेमके कारण अद्याप निश्चित झालेले नसून सर्व बाजूंनी तपास सुरू असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

मृत क्रिकेटपटूची ओळख अदिती मोरेश्वर चौकांडे (वय 17) अशी असून ती मूळची अकोला जिल्ह्यातील होती. गेल्या दोन वर्षांपासून ती आईसोबत नागपुरातील लक्ष्मीनगर परिसरात राहत होती. क्रिकेटमध्ये करिअर घडवण्यासाठी ती नियमितपणे अकादमीत सराव करत होती आणि राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळण्याचे तिचे स्वप्न होते.


अदिती मूळची अकोला जिल्ह्यातील असून, गेल्या दोन वर्षांपासून ती आईसोबत नागपुरात राहत होती. क्रिकेटमध्ये करिअर घडवण्यासाठी ती प्रसिद्ध सुर्वे क्रिकेट अकादमीत नियमित सराव करत होती. तिचे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर क्रिकेट खेळण्याचे स्वप्न होते. तिचा भाऊदेखील क्रिकेटपटू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नुकत्याच झालेल्या विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या निवड प्रक्रियेत अदितीची निवड झाली नव्हती. त्यानंतर ती निराश आणि मानसिक तणावात असल्याचे तिच्या जवळच्या व्यक्तींनी सांगितल्याची माहिती पोलिस सूत्रांकडून मिळाली आहे. घटनास्थळावरून जप्त करण्यात आलेल्या सुसाइड नोटमध्येही निवड न झाल्याचा उल्लेख असल्याचे पोलिसांनी सांगितले. घटनेची माहिती मिळताच बजाजनगर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.
पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला. या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, सुसाइड नोट, कुटुंबीयांचे जबाब, निवड प्रक्रियेसंदर्भातील माहिती आणि इतर सर्व बाबींची चौकशी सुरू आहे. तपास पूर्ण झाल्यानंतरच आत्महत्येमागील नेमके कारण स्पष्ट होईल, असे पोलिसांनी सांगितले.
ही घटना केवळ एका खेळाडूच्या मृत्यूपुरती मर्यादित नसून स्पर्धात्मक क्रीडा क्षेत्रातील वाढता मानसिक ताण, अपेक्षांचे ओझे आणि अपयश स्वीकारण्याच्या आव्हानांवरही गंभीर प्रश्न उपस्थित करणारी ठरत आहे. निवड किंवा अपयश हा क्रीडा प्रवासाचा एक भाग असला तरी अशा परिस्थितीत खेळाडूंना भावनिक आधार, समुपदेशन आणि कुटुंबीयांचा पाठिंबा मिळणे तितकेच महत्त्वाचे आहे. दरम्यान, या दुर्दैवी घटनेमुळे नागपूरच्या क्रीडा वर्तुळात हळहळ व्यक्त केली जात आहे.