कॉकरोच जनता पार्टीचा सरकारला पुन्हा इशारा! उद्यापर्यंत ‘हे’ झालं नाही तर…

नवी दिल्ली : NEET पेपरफुटीविरोधात झालेल्या आंदोलनानंतर आता नव्या वादाला तोंड फुटले आहे. आंदोलनानंतर विविध राज्यांमध्ये आंदोलनात सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करून कारवाई केली जात असल्याचा आरोप कॉकरोच जनता पार्टी ने केला आहे. या पार्श्वभूमीवर संघटनेने सरकारला पुन्हा इशारा दिला आहे.
CJPच्या म्हणण्यानुसार, बिहार, आसाम आणि पश्चिम बंगालमध्ये आंदोलनात सहभागी झालेल्या काही जणांविरोधात एफआयआर दाखल करण्यात आले असून, काहींना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या कारवाईबाबत संघटनेने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

यापूर्वी NEET पेपरफुटीच्या निषेधार्थ दिल्लीतील जंतर-मंतरवर आंदोलन करण्यात आले होते. त्यानंतर देशातील विविध भागांतही आंदोलनाचा विस्तार झाला. या आंदोलनादरम्यान विद्यार्थी आणि विविध संघटनांनी पेपरफुटीविरोधात आवाज उठवला.


आता आंदोलन संपल्यानंतरही आंदोलकांवर होत असलेल्या कथित कारवाईचा मुद्दा पुढे आला आहे. CJPचे प्रवक्ते सौरभ दास यांनी सरकारने आंदोलनकर्त्यांवरील कारवाई तातडीने थांबवावी आणि दाखल केलेले गुन्हे मागे घ्यावेत, अशी मागणी केली आहे. संघटनेने इशारा देत म्हटले आहे की, आंदोलकांवरील एफआयआर मागे घेतले नाहीत, तर पुढील आंदोलनाची दिशा लवकरच जाहीर केली जाईल.