‘फक्त ट्रेंड म्हणून रस्त्यावर उतरू नका!’; CJP आंदोलनावर CM फडणवीसांच्या लेकीची एंट्री, एका पोस्टने सोशल मीडियात खळबळ

मुंबई : दिल्लीतील NEET पेपरफुटी प्रकरणावरून सुरू असलेल्या आंदोलनाचे पडसाद आता केवळ राजकारणापुरते मर्यादित राहिलेले नाहीत. विद्यार्थी, सामाजिक कार्यकर्ते, विविध पक्षांचे नेते आणि सेलिब्रिटींनंतर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कन्या दिविजा फडणवीस यांनीही या विषयावर भूमिका मांडत तरुणांना सावध राहण्याचा सल्ला दिला आहे. त्यांच्या सोशल मीडिया पोस्टमुळे नव्या राजकीय चर्चेला तोंड फुटले असून समर्थक आणि विरोधकांमध्ये वाद रंगू लागला आहे.
गेल्या काही आठवड्यांपासून दिल्लीतील जंतरमंतर येथे NEET पेपरफुटी, परीक्षेतील कथित गैरव्यवहार आणि राष्ट्रीय परीक्षा संस्थेच्या (NTA) कार्यपद्धतीविरोधात आंदोलन सुरू आहे. आंदोलनादरम्यान पोलिसांनी केलेल्या कारवाईनंतर हा मुद्दा आणखी चिघळला. देशभरातील अनेक विरोधी पक्षांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला असून महाराष्ट्रातही विविध संघटनांनी निषेध आंदोलने केली आहेत.

या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर दिविजा फडणवीस यांनी सोशल मीडियावर तरुणांना उद्देशून एक विस्तृत संदेश प्रसिद्ध केला. त्यांनी कोणत्याही आंदोलनात सहभागी होण्यापूर्वी त्यामागील वस्तुस्थिती जाणून घेण्याचे आवाहन केले. “सोशल मीडियावर एखादा विषय ट्रेंड होत आहे म्हणून त्याला आंधळेपणाने पाठिंबा देऊ नका. स्वतः विचार करा, तथ्य तपासा आणि मगच भूमिका घ्या,” असा त्यांचा स्पष्ट सल्ला होता.


त्यांनी लोकशाहीतील विरोधी पक्षांच्या भूमिकेचाही उल्लेख केला. सरकारवर टीका करणे हा लोकशाहीचा भाग असला तरी विरोध हा केवळ सत्ताधाऱ्यांचा द्वेष करण्यासाठी नसून देशहित लक्षात घेऊन विधायक भूमिका घेण्यासाठी असावा, असे त्यांनी नमूद केले. योग्य निर्णयांसाठी सरकारवर दबाव आणणे आणि प्रत्येक गोष्टीला विरोध करणे यात मोठा फरक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
विद्यार्थ्यांच्या आंदोलनाबाबत बोलताना दिविजा यांनी सुरुवातीला विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हितासाठी सुरू झालेल्या आंदोलनाचे महत्त्व मान्य केले. मात्र कोणतेही आंदोलन मूळ मुद्द्यापासून भरकटून धार्मिक, जातीय किंवा इतर संवेदनशील विषयांकडे वळू लागले, तर त्याचा मूळ हेतू कमकुवत होऊ शकतो, असा इशाराही त्यांनी दिला. त्यामुळे कोणत्याही आंदोलनाकडे भावनिक नव्हे तर विवेकाने पाहण्याची गरज असल्याचे त्यांनी म्हटले.
तसेच राजकीय मतभेद असले तरी एकमेकांना वैयक्तिक शत्रू समजू नये, अशी भूमिकाही त्यांनी मांडली. कोणत्याही विचारसरणीच्या अति प्रभावाखाली जाऊन स्वतःची स्वतंत्र विचारशक्ती गमावू नका, असे आवाहन त्यांनी विशेषतः युवकांना केले.
दिविजा फडणवीस यांच्या या पोस्टनंतर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. काहींनी त्यांच्या संयमी भूमिकेचे स्वागत केले, तर काहींनी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर अशा वक्तव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. दिल्लीतील आंदोलन आणि त्यावरून सुरू झालेल्या राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या वातावरणात दिविजा फडणवीस यांच्या प्रतिक्रियेने या चर्चेला आणखी एक नवा आयाम मिळाल्याचे पाहायला मिळत आहे.