नसरापूर प्रकरणात दोषत्व सिद्ध केल्यानंतर पोलिस निरीक्षक विजयमाला पवार यांचे हात मोकळे! उरुळीकांचन पोलिस ठाण्याची सूत्रे खऱ्या अर्थाने स्विकारली! मस्तावलेल्या स्थानिक व्यवस्थेचा कसा बिमोड करणार….

जयदिप जाधव

उरुळीकांचन : नसरापूर बलात्कार प्रकरणात आरोपी भिमराव कांबळेला फाशीच्या शिक्षेपर्यंत पोहचविण्यासाठी तपास कार्यात विशेष चातुर्य दाखवून आरोपीचे दोषत्व सिध्द करण्याची कामगिरी केलेल्या धडाकेबाज अधिकारी पोलिस निरीक्षक विजयमाला पवार यांनी या तपास कार्यातून मुक्त झाल्यानंतर खऱ्या अर्थाने उरुळीकांचन पोलिस ठाण्याची सूत्रे स्विकारल्यानंतर या पोलिसठाण्यात त्यांच्या कामगिरीकडे स्थानिक नागरीकांचे लक्ष लागून राहिले आहे. या पोलिस ठाण्यात माजलेल्या नागरी सुव्यवस्थेचा प्रश्नासह बोकाळलेल्या अवैद्य धंदे व गुन्हेगारीवर त्या कशा पध्दतीने अंकुश आणणार म्हणून नागरीक त्यांच्याकडे अपेक्षेने पाहू लागले आहेत.
पुण्यातील भेसळयुक्त गावठी दारुच्या सेवणानंतर घडलेल्या मृत्यूकांडांनंतर या गुन्ह्याचे मुख्य दारू उत्पन्नाचे स्त्रोत असलेल्या उरुळीकांचन येथून अवैध गावठी दारुचे मुख्य स्त्रोत उघडकीस आल्यानंतर या ठिकाणी अनेक वर्षे स्थायिक हातभट्टी किंग व आरोपींना पोलिसांना या गुन्ह्यात जेरबंद केल्यानंतर या हातभट्टी दारुधंद्यावाल्यांशी संबंध प्रस्थापित केलेल्या कारणावरुन पोलिस निरीक्षक सचिन वांगडे यांची बदली होऊन या प्रकरणात त्यांची चौकशी सुरू आहे. तर दोघा पोलिस ठाण्यातील कर्मचाऱ्यांना या प्रकरणात निलंबित करण्यात आले आहे.

त्यानंतर स्थानिक प्रसारमाध्यमांनी या अवैध गावठी दारु निर्मिती करणाऱ्या व अवैध धंद्याचा शासकीय स्तरावरील प्रतिबंध असलेल्या या भागात माजलेल्या अवैध धंद्याचे कनेक्शन उघड केल्यानंतर या पोलिस ठाण्यातून पोलिस अधिक्षक संदिप सिंह गिल यांनी पोलिस ठाण्याची सूत्रे धडाकेबाज अधिकारी म्हणून नावलौकिक असलेल्या पोलिस निरीक्षकविजयमाला पवार यांच्याकडे १ जून रोजीच दिली आहे.

नसरापूर प्रकरणाचा तपास चालू असताना विजयमाला पवार यांच्याकडे तपास आल्याने त्यांनीया प्रकरणाची न्यायालयीन कार्यवाही पूर्ण करण्यासहीत या पोलिस ठाण्याची सूत्रे स्विकारली होती. त्यामुळे त्यांनी दिवसा नसरापूर न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करीत रात्रीला उरुळीकांचन पोलिस ठाण्याची कारभाराची सूत्रे पाहिली होती. आता मात्र खटल्याचा निकाल लागून आरोपीला फाशीची शिक्षा सुणावल्यानंतर त्यांनी पोलिस ठाण्याचा मोर्चा सांभाळला आहे.
त्यामुळे या धडाकेबाज अधिकाऱ्यांकडे स्थानिक जनतेलाही धडाकेबाज कामगिरीची अपेक्षा असून फोफावलेली गुन्हेगारी वृत्ती, तरुणांत वाढत असलेल्या गुन्हेगारी क्रेझ, अवैध गावठी शस्त्रे, शाळकरी-महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनीची सुरक्षितता, अवैध धंद्यांचे साम्राज्य व सावकारकी या गंभीर प्रकारणांवर जरब बसविणे गरजेचे आहे. तसेच पोलिस ठाण्याचा विस्तार व अपुरी इमारत ,पोलिस आऊट पोस्टची आवश्यकता या बाबींची पूर्तता करण्याचे सांगड त्यांना घालावी लागणार आहे.