जून-जुलै कोरडेच जाणार? ऑगस्टमध्ये अतिवृष्टीची शक्यता; महाराष्ट्रासमोर पाणीटंचाईचे मोठे संकट

मुंबई : राज्यात मान्सूनच्या आगमनानंतरही अपेक्षित पाऊस न झाल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. जून महिन्याचा अर्धा कालावधी उलटून गेला असतानाही अनेक भागांमध्ये समाधानकारक पाऊस झालेला नाही. त्यातच जून आणि जुलै हे दोन्ही महिने तुलनेने कोरडे राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत असून, ऑगस्टमध्ये अतिवृष्टीचा अंदाज वर्तवला जात असल्याने राज्यातील पाणी नियोजनाबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.

राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पावसाच्या अनिश्चिततेबाबत भाष्य करताना आगामी काळातील परिस्थितीबद्दल चिंता व्यक्त केली. जून आणि जुलै महिन्यात पावसाचे प्रमाण कमी राहू शकते, तर ऑगस्टमध्ये जोरदार पावसाची शक्यता असल्याचे संकेत मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. पाऊस हा नैसर्गिक घटक असून त्यावर कोणाचेही नियंत्रण नसल्याचे नमूद करत नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन त्यांनी केले.
राज्यातील धरणांमध्ये अपेक्षित पाणीसाठा निर्माण झाला नाही, तर पुढील वर्षाच्या सुरुवातीलाच अनेक शहरांमध्ये आणि ग्रामीण भागात पाणी कपातीची वेळ येऊ शकते, अशीही शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे स्थानिक प्रशासन आणि जलसंपदा विभागाने आतापासूनच पाणी व्यवस्थापनासाठी तयारी सुरू करण्याची गरज अधोरेखित होत आहे.

दरम्यान, कोकणासह अनेक भागांमध्ये मान्सूनची प्रतीक्षा कायम आहे. मृग नक्षत्राचा कालावधी संपत आला तरी दमदार पावसाची नोंद झालेली नाही. हवेत वाढलेली आर्द्रता, ढगाळ वातावरण आणि प्रचंड उकाड्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. विशेषतः किनारपट्टी भागात पावसाअभावी उष्णतेची तीव्रता अधिक जाणवत आहे.

सिंधुदुर्गसह तळकोकणातील अनेक भागांमध्ये मान्सूनचा वेग मंदावल्याचे चित्र आहे. काही ठिकाणी भात पेरणीची कामे सुरू झाली असली तरी पुरेशा पावसाअभावी शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. अनेक शेतकरी आकाशाकडे डोळे लावून बसले असून पावसाअभावी शेतीचे नियोजन विस्कळीत होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
हवामानातील बदल, एल निनोचा संभाव्य प्रभाव आणि पावसातील अनिश्चितता यामुळे यंदाचा मान्सून राज्यासाठी मोठी परीक्षा ठरण्याची शक्यता आहे. पुढील काही दिवसांतील पावसाची स्थिती राज्याच्या जलसाठ्यांपासून ते खरीप हंगामापर्यंत अनेक बाबींवर परिणाम करणारी ठरणार आहे.