एसटी कर्मचाऱ्यांसाठी दिलासादायक निर्णय! महागाई भत्त्यात वाढ, वेतनात सुधारणा

मुंबई : राज्य सरकारने एसटी कर्मचाऱ्यांसाठी मोठा आणि दिलासादायक निर्णय घेतला आहे. महागाई भत्त्यात ५ टक्क्यांची वाढ करून तो ५३ टक्क्यांवरून ५८ टक्के करण्यात आला आहे. या निर्णयामुळे राज्यातील हजारो एसटी कर्मचाऱ्यांच्या मासिक वेतनात थेट वाढ होणार असून त्यांच्या आर्थिक परिस्थितीत सुधारणा होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा कणा असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांना इतर शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणेच सुधारित आर्थिक लाभ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महागाई आणि वाढत्या खर्चाच्या पार्श्वभूमीवर कर्मचाऱ्यांना दिलासा देणे हा या निर्णयामागील मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
याशिवाय, कर्मचाऱ्यांच्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या घरभाडे भत्त्याची थकबाकी देखील तातडीने अदा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या थकबाकीसाठी सुमारे १०० कोटी रुपयांचा आर्थिक भार राज्य परिवहन महामंडळावर पडणार आहे. मात्र कर्मचाऱ्यांच्या हितासाठी हा निर्णय अत्यंत आवश्यक असल्याचे सरकारने म्हटले आहे.

हा निर्णय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत झालेल्या सविस्तर चर्चेनंतर अंतिम करण्यात आला आहे. या घोषणेनंतर एसटी कर्मचारी संघटनांनी समाधान व्यक्त केले असून, दीर्घकाळापासून सुरू असलेला असंतोष कमी होण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
