महाराष्ट्रात मान्सूनचा रौद्रावतार! ‘या’ भागात अति मुसळधार पावसाचा इशारा..

मुंबई : महाराष्ट्रात मान्सूनने वेगाने प्रगती करत राज्यातील अनेक भागांना जोरदार पावसाने झोडपून काढले आहे. हवामान विभागाने पुढील काही तास आणि पुढील दोन दिवस राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. वादळी वारे, विजांचा कडकडाट आणि जोरदार सरींमुळे नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

हवामान तज्ज्ञांच्या माहितीनुसार, राज्याच्या उत्तरेकडील भागात दोन सायक्लोनिक सर्क्युलेशन सक्रिय झाले असून त्याचा परिणाम महाराष्ट्रातील वातावरणावर होत आहे. त्याचवेळी अरबी समुद्रातून मान्सूनचा प्रवाह अधिक मजबूत होत असल्याने राज्यातील उर्वरित भागांमध्येही पावसाची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे.
या दुहेरी हवामान प्रणालीमुळे कोकण, घाटमाथा आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही भागांमध्ये जोरदार ते अति मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. काही ठिकाणी ताशी 50 ते 60 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता असून विजांच्या कडकडाटासह पावसाचा जोर वाढू शकतो.

मुंबई, ठाणे आणि पालघर परिसरात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी पडण्याची शक्यता असून 10 जूननंतर मान्सून अधिक सक्रिय होण्याचा अंदाज आहे. दरम्यान, उत्तर महाराष्ट्रातील काही भागांमध्ये तुलनेने कमी पाऊस पडू शकतो. तसेच जून महिन्यात मान्सून दाखल झाल्यानंतरही उष्णता आणि दमट वातावरणाचा प्रभाव कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि सातारा जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला असून नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दुसरीकडे, पालघरसह काही भागांमध्ये दमट हवामान आणि उकाड्याचा त्रास कायम राहू शकतो.