लाडक्या बहिणींना दिलासा! पात्र महिलांचे थकीत हप्ते लवकरच खात्यात जमा होण्याची शक्यता..

पुणे : राज्यातील ज्या कुटुंबांचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी आहे, अशा कुटुंबातील महिलांसाठी सरकारने सुरू केलेली लाडकी बहीण योजना पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. या योजनेअंतर्गत पात्र महिलांच्या बँक खात्यात दरमहा ₹1500 जमा केले जात आहेत.

मात्र, अनेक अपात्र महिलांनीही या योजनेचा लाभ घेतल्याचे समोर आल्यानंतर सरकारने केवायसी प्रक्रिया अनिवार्य केली होती. आता ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मोठ्या प्रमाणावर छाननी करण्यात आली असून, सुमारे 80 लाख महिलांना योजनेतून वगळण्यात आले आहे.
तरीही, अनेक पात्र महिलांचे केवायसी आणि कागदपत्रे पूर्ण असूनही त्यांना अद्याप योजनेचा लाभ मिळत नसल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. त्यामुळे लाभार्थींमध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे.

या मुद्द्यावर आमदार बच्चू कडू यांनी आक्रमक भूमिका घेत सरकारला इशारा दिला आहे. पात्र महिलांना तातडीने लाभ मिळावा, अशी त्यांची मागणी असून त्यांनी सरकारला 30 जूनपर्यंतचा अल्टिमेटम दिला आहे. त्यानंतर आंदोलनाचा इशाराही देण्यात आला आहे.

दुसरीकडे, सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे की ज्या महिला पात्र आहेत त्यांचे अर्ज मंजूर करण्यात आले आहेत, तर अपात्र किंवा आवश्यक कागदपत्र न सादर करणाऱ्या लाभार्थ्यांचे अर्ज बाद करण्यात आले आहेत. गैरमार्गाने लाभ घेणाऱ्यांवरही कारवाई करण्यात आल्याचे प्रशासनाने सांगितले आहे.
सरकारच्या या स्पष्टीकरणानंतरही अनेक पात्र महिलांना लाभ न मिळाल्याच्या तक्रारी सुरूच असून, हा मुद्दा आता राजकीय वर्तुळात चांगलाच तापला आहे.