मोठी बातमी! विधान परिषद जागावाटपावर एकनाथ शिंदेंचे मोठे विधान; शिवसेनेला किती जागा मिळणार?

मुंबई : राज्यातील विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये राजकीय हालचालींना वेग आला आहे. 17 जागांसाठी होणाऱ्या या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास अवघे काही दिवस शिल्लक असतानाही महायुतीतील जागावाटपाचा तिढा अद्याप कायम आहे.

याबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे. 18 जून रोजी मतदान होणार असून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत 1 जून आहे. अशा परिस्थितीत जागावाटपावरून सुरू असलेल्या चर्चांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
महाविकास आघाडीने विधान परिषदेच्या सर्व 17 जागा लढवण्याची घोषणा केली आहे. यावर प्रतिक्रिया देताना एकनाथ शिंदे यांनी, “महाविकास आघाडी सर्व जागा लढवेल, मात्र एकही जागा जिंकू शकणार नाही. महायुती सर्व 17 जागा लढवेल आणि सर्व जागांवर विजय मिळवेल,” असा विश्वास व्यक्त केला.

जागावाटपाच्या प्रश्नावर बोलताना त्यांनी महायुतीमध्ये कोणतेही मतभेद नसल्याचे स्पष्ट केले. “जागावाटप सन्मानाने होईल. मुख्यमंत्र्यांनी कालच याबाबत भूमिका स्पष्ट केली आहे. महायुती एकमताने निवडणूक लढवेल आणि सर्व जागा जिंकेल,” असेही ते म्हणाले.

दरम्यान, महाविकास आघाडीमध्ये जागावाटपाचा प्राथमिक फॉर्म्युला समोर आला असून सर्वाधिक जागा काँग्रेसच्या वाट्याला जाण्याची शक्यता आहे. काँग्रेस 7 ते 8 जागा, शिवसेना (ठाकरे गट) 5 ते 6 जागा, तर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) 3 ते 4 जागांवर उमेदवार देऊ शकते, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.