राज्यात जुलैपासून ‘लँड टायटलिंग ॲक्ट’ लागू होणार ; प्रापर्टी कार्ड म्हणून मालमत्ता गणली जाणार – महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा ….


पुणे : ‘लँड टायटलिंग ॲक्ट’ येत्या जुलै महिन्यात राज्यात लागू होणार असून असा कायदा करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरणार आहे. या कायद्यामुळे राज्यातील १४ कोटी जनतेची मालमत्ता ही निश्चित प्रॉपर्टी म्हणून गणली जाणार असून जगातील कुठल्याही देशात ती कॅश करता येईल, असे प्रतिपादन राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.

भारती विद्यापीठाच्या ६२ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी शिक्षण मंत्री दादाजी भुसे, आमदार भीमराव तापकीर, भारती विद्यापीठाचे कार्यवाह आमदार डॉ. विश्वजीत कदम, कुलपती डॉ. शिवाजीराव कदम, ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई, कुलगुरू डॉ. विवेक साळवी यांच्यासह विद्यापीठाचे पदाधिकारी उपस्थित होते.

बावनकुळे म्हणाले, स्वर्गीय डॉ. पतंगराव कदम यांनी शिक्षण क्षेत्रात उभारलेले कार्य हे महाराष्ट्राच्या अभिमानाचे प्रतीक आहे. ‘गल्लीतली शाळा’ ते भारती विद्यापीठाला जागतिक स्तरावर नेण्याचा संकल्प केला आणि तो पूर्ण करून दाखवला. त्यांच्या विचारांचा प्रकाश आज देश-विदेशात पोहोचत आहे.

ते म्हणाले, शिक्षणाशिवाय विकसित भारताची संकल्पना पूर्ण होऊ शकत नाही. राज्य शासनाने कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) धोरण राबवून दीड हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे करार केले आहेत. तसेच दीड लाख विद्यार्थ्यांना कृत्रिम बुद्धिमत्ता ( ए. आय)तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली आहे. आगामी काळात विद्यापीठांनी तंत्रज्ञान आणि ए.आय. स्वीकारणे अत्यावश्यक आहे.

विद्यार्थ्यांना शैक्षणिक कागदपत्रांसाठी कोणत्याही स्टॅम्प पेपरची आवश्यकता राहिलेली नसून विविध प्रमाणपत्रे विनामूल्य उपलब्ध करून देण्यात येत आहेत. ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल अभियान’ अंतर्गत राज्यातील ३० लाख विद्यार्थ्यांपर्यंत आवश्यक कागदपत्रे मोफत पोहोचविण्याची व्यवस्था उभी करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

लोकाभिमुख, पारदर्शक आणि गतिमान प्रशासन हीच छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणा असल्याचे सांगत सरकारने समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचले पाहिजे, असेही ते म्हणाले. नागपूर येथे भारती विद्यापीठाचा विस्तार व्हावा, अशी अपेक्षा व्यक्त करत त्यांनी आवश्यक जागा व शासनस्तरीय सहकार्य देण्याची ग्वाही दिली. तसेच ‘टिटबिट पॉलिसी’च्या माध्यमातून अडचणीत असलेल्या भूखंडांचा मार्ग काढण्याबाबतही सकारात्मक भूमिका मांडली.

यावेळी शिक्षण मंत्री दादाजी भुसे म्हणाले, “शिक्षणानेच माणसाची प्रगती होऊ शकते” हा संदेश देत पद्मभूषण कर्मवीर भाऊराव पाटील यांनी शिक्षणाची चळवळ उभी केली. त्याच ध्येयाने स्वर्गीय डॉ. पतंगराव कदम यांनी प्रतिकूल परिस्थितीतून शिक्षण क्षेत्रात वटवृक्ष उभा केला. एका छोट्या खोलीत सुरू झालेल्या शाळेचे आज जागतिक पातळीवरील विद्यापीठात रूपांतर झाले असून हे कार्य प्रेरणादायी असल्याचे त्यांनी नमूद केले.

ग्रामीण व गरीब विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण उपलब्ध करून देणे ही काळाची गरज असल्याचे सांगत त्यांनी शिक्षणासोबत संस्कार, राष्ट्रभक्ती आणि शिस्तही महत्त्वाची असल्याचे अधोरेखित केले. विद्यार्थ्यांसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता शिक्षण, सैनिक प्रशिक्षण, विद्यार्थिनींसाठी सेल्फ डिफेन्स प्रशिक्षण, शिक्षकांचे प्रशिक्षण, शाळांमध्ये स्वच्छ पिण्याचे पाणी व स्वच्छतागृहे यांसारख्या उपक्रमांवर शासन भर देत असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी जेष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई यांना दुसरा डॉ. पतंगराव कदम स्मृती पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. त्याच बरोबर भारती विद्यापीठातील संशोधक, प्राध्यापक, कर्मचारी यांचाही विशेष गौरव करण्यात आला.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!