दहावीचा निकाल जाहीर! मुलींनी पुन्हा मारली बाजी; कोकण ठरला अव्वल, कोणता विभाग ठरला शेवटचा?

पुणे : अखेर लाखो विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली असून महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून दहावीचा निकाल आज दुपारी १ वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येणार आहे. निकालापूर्वी बोर्डाकडून महत्त्वाची आकडेवारी जाहीर करण्यात आली असून यंदाही कोकण विभागाने राज्यात अव्वल स्थान पटकावले आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष त्रिभुवन कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत निकालाची माहिती दिली. यंदा राज्याचा एकूण निकाल ९२.९ टक्के लागला असून मुलींनी पुन्हा एकदा बाजी मारली आहे.
यावर्षी ९४.९६ टक्के मुली उत्तीर्ण झाल्या असून मुलांचा निकाल ८९.५६ टक्के लागला आहे. मुली आणि मुलांच्या निकालात जवळपास ५ टक्क्यांचा फरक दिसून आला आहे. तसेच राज्यभरात एकूण ६४ विषयांची परीक्षा घेण्यात आली होती. त्यापैकी २० विषयांचा निकाल १०० टक्के लागल्याची माहिती बोर्डाकडून देण्यात आली.

दरवर्षीप्रमाणे यंदाही कोकण विभागाने अव्वल स्थान कायम राखले आहे. कोकण विभागाचा निकाल ९७.६२ टक्के लागला असून सर्वात कमी निकाल छत्रपती संभाजीनगर विभागाचा लागला आहे. त्या विभागाची टक्केवारी ८८.४१ इतकी आहे.

विभागनिहाय निकाल पुढीलप्रमाणे…
पुणे – ९४.२४ टक्के
नागपूर – ८९.०७ टक्के
छत्रपती संभाजीनगर – ८८.४१ टक्के
मुंबई – ९४.९७ टक्के
कोल्हापूर – ९५.४७ टक्के
अमरावती – ९०.५० टक्के
नाशिक – ९०.५३ टक्के
लातूर – ८८.४२ टक्के
कोकण – ९७.६२ टक्के
परीक्षेचा निकाल वेळेत जाहीर व्हावा यासाठी यंदा दहावीची परीक्षा १० दिवस आधी घेण्यात आली होती. तसेच विद्यार्थ्यांसाठी समुपदेशन सुविधा आणि हेल्पलाइनची सुविधाही राज्यातील ९ विभागीय मंडळांमार्फत उपलब्ध करून देण्यात आली होती.
विद्यार्थ्यांना दहावीचा निकाल पुढील अधिकृत संकेतस्थळांवर पाहता येणार आहे.