रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी मोठी अपडेट; १ मेपासून मराठी सक्ती लागू, पण लगेच…

पुणे : राज्यात रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषा अनिवार्य करण्याच्या निर्णयावरून राजकीय वातावरण तापले असताना, सरकारने अंमलबजावणीबाबत अधिक लवचिक भूमिका घेतली आहे.

मंत्रालयात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत या निर्णयावर सविस्तर चर्चा झाली. तब्बल ६९ वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीनंतर, महाराष्ट्र दिनापासून (१ मे) नियम लागू करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे.
मात्र, ज्या चालकांना अद्याप मराठी भाषा येत नाही, त्यांच्यावर लगेच दंडात्मक कारवाई केली जाणार नाही. त्यांना भाषा शिकण्यासाठी पुरेसा कालावधी देण्यात येणार आहे, असे सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

या अनुषंगाने १ मे ते १५ ऑगस्ट या कालावधीत विशेष प्रशिक्षण मोहीम राबवली जाणार आहे. आरटीओ कार्यालयांच्या माध्यमातून चालकांसाठी मराठी भाषा शिकण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाईल.

या मुदतीनंतर, म्हणजेच १६ ऑगस्टपासून नियम न पाळणाऱ्यांवर कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल, असे संकेत देण्यात आले आहेत. मात्र त्या कारवाईचे नेमके स्वरूप सध्या स्पष्ट करण्यात आलेले नाही. एकूणच, सरकारने कठोर निर्णय घेतला असला तरी अंमलबजावणीत सध्या सवलतीचा आणि प्रशिक्षणावर भर देणारा दृष्टिकोन स्वीकारला आहे.