मोठी हवामान अपडेट! अल निनोचा प्रभाव, हवामान विभागाचा सतर्क राहण्याचा इशारा…

पुणे : राज्यात सध्या उष्णतेची तीव्र लाट कायम असून विदर्भ आणि मराठवाडा अक्षरशः तापले आहेत. अनेक जिल्ह्यांमध्ये तापमान ४१ अंश सेल्सिअसच्या पुढे गेले असून नागरिकांना उकाड्याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

काही ठिकाणी पुढील ४८ तासांत हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असली, तरी एकूणच उष्णतेचा तडाखा कायम राहणार आहे. येणाऱ्या मान्सूनबाबतही चिंता व्यक्त केली जात आहे. India Meteorological Department च्या प्राथमिक अंदाजानुसार, यंदा पावसावर अल निनोचा प्रभाव राहण्याची शक्यता आहे.
त्यामुळे राज्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तज्ज्ञांच्या मते, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात अल निनोचा सर्वाधिक प्रभाव जाणवू शकतो. मात्र, जर सकारात्मक Indian Ocean Dipole विकसित झाला, तर पावसावरील नकारात्मक परिणाम काही प्रमाणात कमी होऊ शकतो.

राज्यातील वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांनी उच्चस्तरीय बैठक घेत परिस्थितीचा आढावा घेतला. या बैठकीला कृषी, जलसंपदा, वित्त आणि पुनर्वसन विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. संभाव्य दुष्काळी परिस्थितीला तोंड देण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

मुख्यमंत्र्यांनी ‘जलयुक्त शिवार’ आणि ‘गाळमुक्त धरण’ यांसारख्या महत्त्वाच्या प्रकल्पांना गती देण्याचे निर्देश दिले असून, पाणी साठवणूक वाढवण्यावर विशेष भर देण्यात आला आहे. यासोबतच, चारा टंचाई टाळण्यासाठी आणि प्रभावी पाणी व्यवस्थापनासाठी जिल्हानिहाय विशेष पथके स्थापन करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.