आता कार्यकर्ते फक्त सतरंज्या उचलणार नाहीत; काम करणाऱ्यांनाच मिळणार संधी – सुनेत्रा पवार

बारामती : राजकारणात कार्यकर्त्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची मानली जाते, मात्र अनेकदा प्रत्यक्ष काम करणाऱ्या कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष होत असल्याची भावना व्यक्त केली जाते. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी कार्यकर्त्यांना स्पष्ट संदेश देत संघटनात्मक बदलांची दिशा स्पष्ट केली आहे.

राज्याचे दिवंगत माजी मुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर बारामती विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. या पार्श्वभूमीवर सुनेत्रा पवार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला असून आज त्यांच्या प्रचाराला अधिकृत सुरुवात झाली.
कन्हेरी येथे आयोजित जाहीर सभेतून या प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. या वेळी बोलताना त्यांनी कार्यकर्त्यांना ठाम शब्दांत संदेश दिला की, कार्यकर्त्यांनी केवळ सतरंज्या उचलण्यापुरते मर्यादित न राहता पक्षासाठी आणि जनतेसाठी खऱ्या अर्थाने काम करणाऱ्यांना योग्य न्याय दिला जाईल. त्यांनी संघटनात्मक पातळीवर बदल घडवून आणण्याचे संकेतही दिले.

यावेळी आपल्या भाषणात उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी महिला नेतृत्वाबाबत समाजातील दृष्टिकोनावरही भाष्य केले. आजही महिलांच्या नेतृत्व क्षमतेकडे संशयाने पाहिले जाते, माझ्यावरही ही जबाबदारी पार पाडता येईल का, अशी अनेकांना शंका होती, असे त्या म्हणाल्या. मात्र या सर्व शंकांना कामातूनच उत्तर देण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. त्यांच्या या वक्तव्याला उपस्थित महिलांकडून विशेष प्रतिसाद मिळाला.

पवार यांनी ही निवडणूक वैयक्तिक लढत नसून बारामतीकरांची सामूहिक लढाई असल्याचे स्पष्ट केले. जसे आतापर्यंत कुटुंबाची जबाबदारी सांभाळली, तसेच आता बारामती आणि राज्यातील जनतेची जबाबदारी उचलण्यासाठी मी सज्ज आहे, असेही त्यांनी नमूद केले. या विधानातून त्यांनी जनतेशी भावनिक नातं अधिक दृढ करण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून आले.
दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कार्याचा उल्लेख करताना त्यांनी भावनिक सूर लावला. बारामतीच्या विकासात अजितदादांचे योगदान अतुलनीय असून त्यांनी घातलेला विकासाचा पाया अधिक भक्कम करणे हे आपले कर्तव्य आहे, असे त्या म्हणाल्या. त्यांच्या या वक्तव्यामुळे सभेत उपस्थित कार्यकर्ते आणि नागरिक भावूक झाले.