संतोष देशमुखानंतर मस्साजोगचा नवा कारभारी कोण? उमेदवार ठरला, आज दाखल करणार अर्ज

बीड: बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर रिक्त झालेल्या सरपंच पदासाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून नवीन कारभारी कोण होणार याची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे. आता संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी देशमुख याच उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची माहिती समोर आली आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर त्यांच्या पत्नी अश्विनी देशमुख यांना रिंगणात उतरवण्यासाठी देशमुख कुटुंबाने ग्रामस्थांनी चर्चा करून एकमताने हा निर्णय घेतला आहे. त्यानुसारच सरपंचपदाचा उमेदवार म्हणून अश्विनी देशमुख यांचं नाव निश्चित करण्यात आलं आहे. आज सकाळी अत्यंत साध्या पद्धतीनं हा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार आहे.नव्या सरपंचाचा कार्यकाल 18 महिन्यांचा असणार आहे.
दरम्यान, मस्साजोगच्या सरपंच पदासाठी येत्या 13 एप्रिलपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत आहे. संतोष देशमुख यांच्यानंतर सरपंच बिनविरोध होणार की निवडणूक लागणार याबाबत देखील उत्सुकता आहे. मात्र अश्विनी देशमुख यांनाच बिनविरोध सरपंचपद द्यावे अशी गावकऱ्यांची अपेक्षा आहे. मात्र, याबाबत अंतिम निर्णय 13 एप्रिलनंतरच स्पष्ट होणार आहे.

निवडणूक कार्यक्रम
अर्ज भरणे-7 ते 13 एप्रिल
अर्जाची छाननी – 15 एप्रिल
अर्ज मागे घेण्याची तारीख – 17 एप्रिल
मतदान – 28 एप्रिल
निकाल – 29 एप्रिल