मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात!बस जागेवर पलटी झाल्यानं 35 प्रवासी गंभीर जखमी, 2 प्रवाशांचा मृत्यू

मुंबई: मुंबई-गोवा महामार्गावर अपघाताची सत्र वारंवार असते. या महामार्गावरील सुकेळी खिंडीत खासगी स्लीपर बस पलटी झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या अपघातात 35 प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. तर दोन प्रवाशाचां जागीच मृत्यू झाला आहे. जखमी पैकी आठ ते नऊ जणांची प्रकृती चिंताजनक आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी पहाटे सव्वा तीनच्या सुमारास मुंबई-गोवा महामार्गावर नागोठण्याजवळील सुकेळी खिंडीत खासगी बस मुंबईहून गोव्याच्या दिशेने जात होती. खिंडीतील तीव्र वळणावर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने बस पलटी झाली व हा अपघात झाला. चालकाचा ओव्हर स्पीड आणि रस्त्याचे धोकादायक वळण हे या अपघाताचे मुख्य कारण असावे, असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे.
या अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिक, कोलाड आणि नागोठणे पोलीस ठाण्यातील कर्मचारी, एरुणकर टोइंग सर्विस आणि रुग्णवाहिका यंत्रणांनी तत्परतेने घटनास्थळी धाव घेतली. जखमी प्रवाशांना तात्काळ उपचारासाठी नागोठणे प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच पनवेल येथील एमजीएम रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

सागर दहिंबेकर यांनी सांगितले की गेल्या काही वर्षांत सुकेळी खिंडीत गोव्याहून मुंबईकडे येणाऱ्या मार्गावर अनेक अपघात झाले होते. आता मार्गीकेवर हा मोठा अपघात झाल्याने प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.