उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी निवडणूक आयोगाला धाडलं पत्र; पक्षाबाबत केली मोठी मागणी

पुणे : महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.राष्ट्रवादी पक्षाचे सर्व अधिकार त्यांना देण्यात आले आहेत. त्या पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा आहेत. असे असतानाच आता,सुनेत्रा पवार यांनी निवडणूक आयोगाला एक पत्र लिहिले आहे. या पत्रात राष्ट्रवादी पक्षासंदर्भात मोठी मागणी करण्यात आली आहे. या मागणीमुळे आता सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी निवडणूक आयोगाला लिहिलेल्या पत्रात पक्षाबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. 28 जानेवारी 2026 रोजीनंतर पक्षाने केलेला कुठलाही पत्रव्यवहार वैध मानू नये, अशी विनंती सुनेत्रा पवार यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे. अजित पवार यांचा 28 जानेवारी 2026 रोजीच विमान अपघात झाला होता. म्हणजेच अजित पवार यांच्या निधनानंतर पक्षाने आतापर्यंत केलेला कोणताही पत्रव्यवहार अवैध मानावा, अशी विनंतीच सुनेत्रा पवार यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे.
राष्ट्रवादीचे नेते तथा आमदार रोहित पवार यांनी खासदार प्रफुल्ल पटेल आणि खासदार सुनील तटकरे यांना राष्ट्रवादी पक्ष ताब्यात घ्यायचा होता, असा गंभीर आरोप केला होता. या आरोपानंतर आता सुनेत्रा पवार यांनी निवडणूक आयोगाला लिहिलेले हे पत्र समोर आले आहे. त्यामुळेच हे पत्र म्हणजे तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांना धक्का तर नाही ना? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

दरम्यान अजित पवार यांच्या निधनानंतर दोन्ही राष्ट्रवादींचे विलीनीकरण होईल, अशी चर्चा रंगली होती. मात्र काही काळानंतर या चर्चांना अखेर पूर्णविराम मिळाला. आता उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी पाठवलेल्या पत्रामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.