VSR कंपनीवर सरकार मेहरबान ; अजित पवारांच्या अपघातानंतर कंपनीला दिले तब्बल 83 कोटी, रोहित पवारांचा गंभीर आरोप

पुणे : महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताला अधिक कालावधी उलटून गेला तरी संबंधित VSR कंपनीवर अद्यापही कोणती कारवाई झाली नाही. उलट राज्य सरकारने पाच टप्प्यात या कंपनीला 83 कोटी रुपयांचे देयक अदा केले असल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी विधानसभेत केला आहे.

आमदार रोहित पवार यांनी यापूर्वी देखील व्हीएसआर कंपनीवर कागदपत्रांमध्ये फेरफार करण्यात माहीर असल्याचा गंभीर आरोप केला होता. त्यांनी सीआयडीला या संदर्भातील सर्व कागदपत्रे तातडीने ताब्यात घेण्याची मागणी देखील केली होती. त्यानंतर पुण्यामध्ये व्हीएसआर कंपनीच्या प्रतिनिधींना चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. मात्र अद्यापही या कंपनीवर कोणतीही कारवाई झाली नसल्याने अनेक शंका उपस्थित केल्या जात आहेत.
रोहित पवार यांनी असे म्हटले आहे की, VSR कंपनीच्या मालकास जराही कारवाईची भीती नाही. व्हीआरएस कंपनी राज्य सरकारला जुनी विमाने पुरवते. राज्य सरकारने उत्तम विमानांसाठी निविदा काढल्या होत्या. त्यामध्ये व्हीआरएस अपात्र ठरली होती, तरी देखील या कंपनीकडून विमान सेवा पुरवली जात होती.तेव्हा कंपनीच्या मालकाने थयथयाट केला होता, असा दावा आमदार पवार यांनी केला आहे.

धक्कादायक बाब म्हणजे महाराष्ट्राच्या बड्या नेत्याचा अपघात होऊन देखील गुन्हा दाखल न होणे ही अत्यंत निंदनीय बाब आहे.भारतीय न्याय संहितेप्रमाणे देशात कुठेही ‘शून्य’ गुन्हा नोंद करता येतो. अजित पवारांच्या विमान अपघातासंदर्भात मी मुंबईत गुन्हा दाखल करण्यासाठी गेलो, पण पोलीसांनी मला बारामतीला पाठवले. अखेर कर्नाटकात अजित पवारांच्या विमाना अपघाताची तक्रार नोंदवली अशी माहिती देखील पवार यांनी दिली.
विधानसभेत बोलताना रोहित पवार म्हणाले, अजित पवारांसारख्या नेत्याने या सभागृहातील किमान शंभर आमदारांना येथे निवडून येण्यासाठी मदत केली. पण, दादांच्या विमान अपघाताच्या चौकशीसंदर्भात विरोधकांनी आणलेल्या प्रस्तावावर बोलण्यास त्यांच्या पक्षातील चेतन तुपे वगळता एकही नेता धजावला नाही, अशी खंत पवार यांनी व्यक्त केली.काही पक्षांनी तर अजित पवार यांच्या अपघाताच्या चौकशीच्या चर्चैत भाग घेऊ नका, असे आदेश त्यांच्या आमदारांना दिले होते, असा आरोप पवार यांनी केला.
अजित पवार यांच्या विमान अपघाताची केंद्रीय तपास संस्थेकडून चौकशी करण्याची मागणी केलेली आहे. ही मागणी पूर्णत्वास नेण्याचा पाठपुरावा उपमुख्यमंत्री या नात्याने सुनेत्रा पवार यांनी करायचा आहे. मात्र त्या स्वतः त्याच कंपनीच्या विमानांमध्ये दौरे करत आहेत.त्यामुळे कंपनीचा आत्मविश्वास दुणावला आहे. या शब्दात रोहित पवार यांनी सुनेत्रा पवार यांच्यावर देखील निशाणा साधला.