साखर कारखान्यांसाठी मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय ; आर्थिक सहाय्यासाठी राज्यस्तरावर समिती, तातडीचे निर्देश.

पुणे : राज्यातील साखर उद्योग हा महत्त्वाचा उद्योग असून या उद्योगाच्या सक्षमीकरणासाठी राज्य शासन धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी सकारात्मक पावले उचलत आहे. या उद्योगांच्या आर्थिक सहाय्याच्या दृष्टीने राज्यस्तरावर मुख्य सचिवांनी तातडीने समिती गठीत केली आहे. गठित समितीला स्वयंस्पष्ट अहवाल त्वरीत सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत.

विधानभवनात साखर उद्योगाच्या प्रश्नांसंदर्भात आयोजित बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधितांना निर्देशित केले.मुख्यमंत्री म्हणाले, राज्यातील साखर कारखान्यांच्या अडीअडचणी लक्षात घेता येत्या गाळप हंगामाची व्यापक प्रमाणात सुरवात होण्याच्या दृष्टीने साखर कारखान्यांना शक्य ते आर्थिक सहाय्य करण्यासाठी कृती आराखडा तयार करण्यात यावा. यासाठी मुख्य सचिवांनी राज्यस्तरीय समितीचे गठन करावे केंद्र सरकारकडून ही साखर उद्योगाला मदत मिळवण्यासाठी प्रयत्न केले जातील असं त्यांनी सांगितलं.
स्थापन केलेल्या समितीत सहकार कृषी आणि वित्त विभागाचे सचिव,साखर आयुक्त,उद्योग सचिव तसेच राज्य सहकारी बँकेचे व्यवस्थापकीय संचालक यांचा समावेश करण्यात आला आहे. समितीने तातडीने अहवाल सादर केल्यानंतर राज्य सरकार साखर उद्योगांसाठी धोरणात्मक निर्णय घेणार आहे. यामुळे साखर उद्योगांना मोठा दिलासा मिळाला आहे.

साखर उद्योगांना आर्थिक सहाय्य करण्यासाठी सरकारकडून स्थापन करण्यात आलेली समिती आर्थिक अडचणीचे स्वरूप, त्यावरील उपाय योजना,पर्यायी व्यवस्था,उद्योगांसाठी आवश्यक असलेली पॅकेजची शिफारस या मुद्द्यांवर काम करणार आहे.