‘महाराष्ट्राचे प्रेम हीच माझी ऊर्जा….; शरद पवारांचे जनतेला भावनिक पत्र, सोशल मीडियावर व्हायरल..

पुणे : राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी जनतेसाठी लिहिलेल्या भावनिक पत्राची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात होत आहे. राज्यसभेसाठी अर्ज भरल्यानंतर जनतेचे आभार मानणारे एक भावनिक पत्र त्यांनी लिहिले आहे. महाराष्ट्राचे प्रेम हीच माझी ऊर्जा आहे, असं त्यांनी पत्रात नमूद केल आहे.

राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आपल्या पत्रात असे नमूद केले आहे की,महाराष्ट्राने दिलेले प्रेम, विश्वास आणि पाठबळ हेच आपल्या आयुष्याच्या ऊर्जेचे खरे स्रोत आहेत. राज्याच्या विकासासाठी आयुष्यभर काम करण्याची संधी मिळणे हे आपले भाग्य आहे. पुढील काळातही जनतेच्या अपेक्षांना न्याय देत प्रामाणिकपणे सेवा करत राहीन, असा निर्धार केला आहे.
आतापर्यंत राजकीय क्षेत्रात विविध जबाबदाऱ्या पार पाडताना महाराष्ट्राच्या तसेच देशाच्या विकासासाठी सकारात्मक काम करता आले, यामागे जनतेचा विश्वास आणि पाठिंबा हेच सर्वांत मोठे बळ राहिले. महाराष्ट्रातील जनतेने पुन्हा एकदा पुढील सहा वर्षे सेवा करण्याची संधी देऊन विश्वास दाखवला, असे नमूद करून पवार यांनी पत्रात राज्यातील जनतेचे आणि मित्रपक्षांचे आभार मानले आहेत.

गेल्या काही दिवसांपूर्वी शरद पवार यांची तब्येत बिघडल्याने त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र सध्या प्रकृतीच्या कारणामुळे डॉक्टरांनी विश्रांती घेण्याचा सल्ला दिल्याने प्रत्यक्ष भेटीगाठी शक्य नसल्याचे त्यांनी पत्रात नमूद केले आहे. शरद पवार यांचे नातू आणि आमदार रोहित पवार यांनी समाजमाध्यमावर हे पत्र प्रसिद्ध केले आहे.