१ मे पासून ‘मिसिंग लिंक’ सुरू होणार?, पुणे-मुंबई प्रवासात आता अर्धा तास वाचणार; पण या वाहनांना ‘नो एन्ट्री’….

पुणे : मिसिंग लिंक’ प्रकल्प आता अंतिम टप्प्यात आला आहे. येत्या १ मे पासून हा मार्ग प्रवाशांसाठी खुला करण्याचे नियोजन महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने केले आहे. मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील बोरघाटातील वाहतूक कोंडीतून प्रकल्प बांधण्यात आले आहे.

मात्र, सुरुवातीच्या काळात या मार्गावरून केवळ हलक्या वाहनांनाच प्रवेश मिळणार असून जड आणि धोकादायक वाहनांवर निर्बंध घालण्यात आले आहेत. काही दिवसांपूर्वीच एक्सप्रेसवेवर ज्वलनशील पदार्थांचा टँकर उलटल्याने तब्बल ३० ते ३२ तास वाहतूक ठप्प झाली होती.
अशा प्रकारच्या अपघातांमुळे होणारी कोंडी आणि जीवितहानी टाळण्यासाठी प्रशासनाने खबरदारी घेतली आहे. ‘मिसिंग लिंक’वर सुरुवातीचे सहा महिने ज्वलनशील पदार्थ वाहून नेणाऱ्या टँकर्सना आणि जड वाहनांना प्रवेश दिला जाणार नाही. या सहा महिन्यांतील अनुभवांचा अभ्यास केल्यानंतरच जड वाहनांबाबत निर्णय घेतला जाईल.

जरी एमएसआरडीसीने १ मे रोजी मार्ग खुला करण्याचे उद्दिष्ट ठेवले असले, तरी काही तांत्रिक कामे शिल्लक राहिल्यास हा मुहूर्त थोडा लांबणीवर पडण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे. एप्रिल महिन्यात या मार्गावर वाहनांच्या चाचण्या घेतल्या जातील.
दरम्यान, ‘मिसिंग लिंक’मुळे लोणावळा ते खालापूर हा अत्यंत वळणावळणाचा आणि घाटाचा रस्ता टाळता येणार आहे. यामुळे प्रवासाचा वेळ २० ते २५ मिनिटांनी कमी होणार असून इंधनाचीही मोठी बचत होणार आहे. जगातील सर्वात रुंद बोगद्यांचा समावेश असलेल्या या प्रकल्पामुळे पुणे-मुंबई प्रवास अधिक सुरक्षित आणि वेगवान होणार आहे.